रत्नागिरी : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांचे अज्ञान उघड केले म्हणून एवढा मोठा थयथयाट केलात का? असा सवाल करीत भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी केलाय. तसेच ‘हम किसी को छेडेंगे नहीं, कोई हमको छेड़ेगा तो उसको छोड़ेंगे नहीं’, असा इशाराही शेलार यांनी शिवसेनेला दिला.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन-आशीर्वाद यात्रेवेळी बोलताना आमदार आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली. मंत्री नारायण राणे यांना झालेली अटक आणि शिवसेनेने केलेला तमाशा याचे खरे कारण काय होते? मुख्यमंत्र्यांचे अज्ञान राणें यांनी उघड केले म्हणून एवढा राग आला का? अशी प्रश्नांची सरबत्तीच शेलार यांनी यावेळी केली आहे.
याच महिन्यात मंत्रालयासमोर सुभाष जाधव या शेतकऱ्यांने आत्महत्या केली. तर इंदापूरचे शिवाजी चितळकर यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या सभेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तर पालघरमध्ये आदिवासी काळू पवार याने पाचशे रुपयाचे मुलाच्या अंत्यसंस्कारासाठी कर्ज घेतले, त्या प्रकरणी छळ झाला म्हणून आत्महत्या केली. या घटनांतून राज्य सरकारविषयी असलेला असंतोष प्रकट होऊ लागला आहे.
या घटनांवरून जनतेचे लक्ष विचलीत करण्यासाठी राणे यांना अटक आणि त्यानिमित्ताने हिंसक घटना घडविल्या जात असाव्यात असा संशयही शेलार यांनी यावेळी व्यक्त केलाय. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विविध योजनांची माहितीही त्यांनी दिली.