Devendra Fadnavis : राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या बंडानंतर महायुतीचे सरकार स्थापन झाले. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना, भाजपा आणि अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा समावेश आहे. तीनही पक्षात चांगला संवाद असल्याचे सांगितले जात असले तरी तीनही पक्षांमध्ये काही तरी बिनसल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात कायम असते. त्यातच शिवसेना ( शिंदे गट ), भाजपा आणि राष्ट्रवादी ( अजित पवार गट ) यांच्यात २०२४ साली होणाऱ्या लोकसभेच्या जागावाटपावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मोठे वक्तव्य समोर आले आहे.
आगामी लोकसभेच्या जागेविषयी बोलताना,“लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीचं जागावाटप जवळपास निश्चित झालं आहे. भाजपा २६, तर शिवसेना ( शिंदे गट ) आणि राष्ट्रवादी ( अजित पवार गट ) २२ जागा लढविणार आहेत,” अशी माहिती देवेंद्र फडणवीसांनी एका इंग्रजी वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही माहिती दिली.
पुढे बोलताना त्यांनी,“एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार काम करत आहे. नेतृत्वात बदल होणारे वृत्त खोटे आहे. तसेच, मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही. नागपूर येथील पारंपारिक विधानसभा मतदारसंघ निवडणुकीला उभे राहणार,” असे देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.
त्यासोबतच “महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघाचा सर्व्हे करण्यात आला आहे. आमच्याकडे विजयी होणाऱ्या उमेदवारांची माहिती प्राप्त झाली आहे. २०१९ साली निवडून आलेल्या खासदारांना पुन्हा उमेदवारी देणं ही परंपरा आहे. पण, हा अंतिम शब्द नाही. अंतिम निर्णय घेण्यापूर्वी विविध स्तरांवर चर्चा केली जाईल,” असे देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.
“नागपूर येथील विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन पार पडल्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरूवात होईल. अधिवेशनानंतर भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या मतदारसंघनिहाय बैठका घेण्याचा आमचा विचार आहे. एखाद्या ठिकाणी भाजपाचा उमेदवार निवडणूक लढत असेल, तर शिवसेना आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते त्यांचा उमेदवार असल्यासारखं प्रचार करतील. हाच नियम शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांबाबतही लागू होईल,” असे फडणवीसांनी म्हटले. “लोकसभा निवडणुकीत महायुती ४० ते ४२ जागांवर विजयी होईल. देशातील जनता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठिशी आहे,” असा विश्वास देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला.