Kolhapur Airport : कोल्हापूर-तिरुपती थेट विमानसेवा बंद होणार आहे. याचा फटका प्रवाशांना बसणार आहे. भाविकांचा प्रवास सुखकर आणि वेळेची बचत होण्यासाठी कोल्हापूर-तिरूपती थेट विमानसेवा सुरू करण्यात आली. या सेवेला चांगला प्रतिसाद मिळाला होता. मात्र आता ही विमानसेवा येत्या 15 डिसेंबरपासून बंद केली जाणार आहे.
ही सेवा आता व्हाया हैदराबाद अशी होणार असल्याने प्रवाशांना पूर्वीपेक्षा तीन तास पाच मिनिटे जादा वेळ तसेच सव्वा दोन हजाराहून अधिक तिकीट दराचा फटका बसणार आहे. याबाबतची माहिती इंडिगो कंपनीने संकेतस्थळावरून दिली आहे. यामुळे प्रवाशांना पूर्वीपेक्षा तीन तासापेक्षा जास्त वेळ लागणार आहे. कोल्हापूरहून हैदराबाद मार्गे तिरुपतीला जावं लागणार असल्याने प्रवाशांना मोठा फटका बसणार आहे.
The direct flights between Kolhapur and Tirupati are marked as suspended post 14th Dec’23. Given the growing demand from pilgrims, tourists, and business travelers, it’s crucial to sustain this route. I request @IndiGo6E to maintain the direct flights on this route. Also,…
— Satej (Bunty) D. Patil (@satejp) November 24, 2023
कोल्हापूर- तिरुपती विमानसेवा बंद करू नये यासाठी सतेज पाटील यांची मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांना विनंती केली आहे. श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी अनेक भाविक तिरुपतीहून कोल्हापुरात येतात. त्यांच्यासाठी विमानसेवा ही वेळेची बचत करणारी ठरते. अशातच इंडिगो एअरलाईनसची कोल्हापूर -तिरुपती विमान सेवा रद्द झाल्यास प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे. यात्रेकरू, पर्यटक आणि व्यावसायिक प्रवाश्यांची वाढती मागणी लक्षात घेता कोल्हापूर आणि तिरुपती दरम्यानचा हा मार्ग टिकवून ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे ही सेवा सेवा रद्द न करता पूर्ववत सुरू ठेवावी अशी मागणी आमदार सतेज पाटील यांनी केली आहे.
कोरोनाच्या काळात काही दिवस विमानसेवा बंद होती. त्यानंतर 2021 पासून पुन्हा या सेवेला सुरूवात झाली. तिरुपती ते कोल्हापूर प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. मात्र आता नव्या सेवेनुसार, कोल्हापूरहून तिरुपतीला जाणारे विमान दुपारी 2 वाजून 40 मिनिटांनी उड्डाण करेल. त्यानंतर ते हैदराबादला जाईल. तेथून सायंकाळी 7 वाजून 25 मिनिटांनी ते तिरुपतीला पोहचणार आहे.