विकासाचे नव्हे तर जाती-धर्माचे भावनिक राजकारण
नगर – काना, मात्रा, वेलांटी, उकार, अनुस्वार नसलेल्या नगर शहराच्या राजकारणाचा बाज जिल्ह्यातील बाराही मतदारसंघापेक्षा वेगळ्या धाटणीचा आहे. येथे विकासापेक्षा भावनिक राजकारणाला आणि जाती-धर्माच्या समीकरणाला जादा महत्व दिले जाते. पाच टर्म शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांनी या मतदारसंघावरची पकड कधी ढळू दिली नाही. पण मागील 2014 च्या निवडणुकीत भाजप-सेना स्वतंत्र लढले अन् राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संग्राम जगताप नगरच्या आमदारकीच्या सिंहासनावर आरूढ झाले.
जगताप यांनी शहराच्या विकासाचा मुद्दा घेवून मागील निवडणूक लढविली पण या पाच वर्षात हा विकास कुठे सापडलाच नाही. तो हरवलेलाच होता. मग राठोड यांनीच जुना नगर भयमुक्तीचा नारा पुन्हा रेटून नेला. या भयमुक्तीच्या गदारोळात मोठ्या विकासप्रकल्पांचे तर सोडाच पण मुलभूत प्रश्न तरी किती मार्गी लागले जात आहेत. हा संशोधनाचा विषय आहे. यावेळची निवडणूक ही खूप वेगळ्या मुद्यावर लढली जाईल, असे आजचे तरी चित्र नाही.
मागील वेळी सेना-भाजप जशी वेगळी लढली तशीच दोन्ही कॉंग्रेसही वेगळी लढली. जगताप व राठोड यांच्या मतांमधील अंतर अवघ्या अडीच हजार मतांचे राहिले. पण कॉंग्रेसचे सत्यजित तांबे यांनी 17 हजाराच्या घरात मिळविलेली मते व भाजपचे चिन्ह घेवून लढलेल्या अभय आगरकरांनी पंचवीस हजाराच्या घरात मते मिळविली. यात माळी समाजाच्या मतांचा मोठा वाटा होता. हा मतदार दरवेळी राठोड यांना संधी देत होता. तोच मागीलवेळी बाजुला गेल्याचा तोटा राठोड यांना बसला. तसाच तांबे यांना जी सतरा हजाराच्या घरात मते मिळाली ती जगताप यांचे विजयाचे मताधिक्य कमी करण्यास कारणीभूत ठरलीच! त्यात मराठा समाजाची एकगठ्ठा मते जगताप यांच्याकडे वळल्याने तो लाभ त्यांना झाला.
यावेळी चित्र काही वेगळे राहणार आहे. आगरकर युतीचा धर्म पाळत राठोड यांना मदत करणार असल्याने माळी समाजाची मते परत राठोड यांच्याकडे वळतील. मात्र माजी खासदार दिलीप गांधी राठोड यांच्यापासून दूरच राहिले तर जैन समाजाची मते काही प्रमाणात बाजूला जावू शकतात. व्यापारी वर्ग नगर शहरात मोठा आहे. त्यांची भूमिका महत्वाची आहे. त्याचबरोबर पदमशाली समाज दरवेळी पारंपारिक पध्दतीने राठोड यांच्या पाठीशी राहिला आहे. मात्र यावेळी माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वापरलेल्या अपशब्दाने शहरातील वातावरण ढवळून निघाले. सेनेने छिंदमला व्हिलन करण्याची कोणतीच संधी सोडली नाही. मात्र असे असतानाही पदमशाली समाजाच्या बळावर त्यांनी महापालिका निवडणुकीत बाजी मारली. पण राठोड समर्थकांच्या वागण्यात काही बदल झाला नाही.
छिंदमला ही प्रतिमा पुसायची आहे, पण त्यात सेनेचा मोठा अडथळा येत आहे. हे हेरून छिंदम यांनी बसपाच्या हत्तीवर आरूढ होण्याचा निर्णय घेतला. पदमशाली समाज नेहमी राठोड यांच्याबरोबर राहिलेला आहे. ती मते आपल्या बाजूलाच राहून द्यायची असेल तर सेनेने छिंदम यांच्याबाबतचा विरोध कमी करावा अशी छिंदमची इच्छा आहे. त्यामुळे राठोड यांनी तसा शब्द दिला तर छिंदम यांची उमेदवारी जरी कायम राहिली तरी अंतर्गत मदत राठोड यांनाच होवू शकेल, असा राजकीय गोटात अंदाज आहे.
एमआयएमचे नगरसेवक असिफ सुलतान हे मुस्लिम समाजाची मते घेवू शकतात. मुस्लिम समाजही शहरात मोठा आहे. यातील बहुतेक मते जगताप यांच्याकडे जाणारी होती, मात्र एमआयएमची उमेदवारी त्यांना त्रासदायक होवू शकते. कम्युनिस्ट पक्षाचा झेंडा खांद्यावर घेवून भैरवनाथ वाकळे मैदानात उतरले आहेत. कामगार वर्गातील मते ते स्वतःकडे वळवू शकतात. किरण काळे यांनी बंडाचा झेंडा घेत व आमदार जगताप पिता-पुत्रांवर आरोपाचे बाण सोडत वंचित आघाडीकडून लढण्याचा निर्णय धेतला आहे. ते जर रिंगणात राहिले तर त्यांनी केलेल्या जगताप यांच्यावरील आरोपचा लाभ राठोड यांच्याकडे झुकू शकतो.
या साऱ्या जातीधर्माच्या व भावनिक राजकारणाच्या पल्याड नगर शहराचे वर्तुळ आखायला कुणी तयार नाही. उडाणपूल, एमआयडीसी विस्तारीकरण, आयटी पार्क, सीना नदीचे विस्तारीकरण व सुशोभिकरण यासोबतच चांगले रस्ते, आरोग्य, पाणी हे प्रश्न नगरकरांच्या दृष्टीने महत्वाचे आहेत. पण ना पुढारी याकडे गांभीर्याने बघतात ना नागारिक जागृकता दाखवतात त्यामुळे नगर शहराचा विकास हरवला असून येथे भयमुक्त नगर शहर हाच नारा महत्वाचा ठरत आहे.