महाराष्ट्रात सत्ता असतानाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शिवसेनेचा दुसरा उमेदवार निवडून आणता आला नाही. जे इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना जमलं ते उद्धव ठाकरेंना का नाही?
अशोक गेहलोत, मनोहरलाल खट्टर आणि बसवराज बोम्मई या तिन्ही मुख्यमंत्र्यांनी सिद्ध करून दाखविलं की, राज्यातील राजकारणावर त्यांचं पूर्ण नियंत्रण आहे. खरेतर पोटनिवडणुका आणि राज्यसभेच्या निवडणुकीत सत्ताधारी पक्षाचा वरचष्मा असतो; परंतु आपल्याला हे का जमलं नाही? आणि विरोधी पक्षनेत्याने आपल्यावर मात कशी केली? याचा विचार करून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुढचं धोरण आखायला हवं! महाराष्ट्रासह 4 राज्यांतील राज्यसभेच्या 16 जागांसाठी झालेल्या अटीतटीच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने 8 जागा मिळवून बाजी मारली. कॉंग्रेसला 5, शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला प्रत्येकी एका जागेवर विजय मिळाला. भाजप समर्थीत अपक्षाला एक जागा मिळाली.
राज्यसभेच्या 57 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत 11 राज्यांतील 41 खासदार आधीच अविरोध निवडून आलेत. यात अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि पी. चिदंबरम यांच्यासह सपाचे कपिल सिब्बल यांचा समावेश आहे; परंतु शेवटच्या टप्प्यात 4 राज्यांतील 16 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने कॉंग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षाच्या पायाखालची जमीन खेचली.
भाजपने महाराष्ट्रात शिवसेनेला, हरियाणात कॉंग्रेसला आणि कर्नाटकात संयुक्त जनता दलाला तोंडावर पाडले. हरियाणात कॉंग्रेसचे आमदार कुलदीप बिश्नोई आणि राजस्थानमधील भाजपच्या आमदार शोभारानी यांनी पक्षाच्या विरोधात जाऊन क्रास व्होटिंग केले.
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी संख्याबळ नसतानाही तिसरा खासदार निवडून आणला. हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनीही कॉंग्रेसचे अजय माकन यांना विजयी होऊ दिले नाही. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनीसुद्धा कॉंग्रेस आणि जेडीएसमधील मतभेदाचा पूर्ण फायदा उचलत विजय मिळविला.
राजस्थानमध्ये काय झाले?
राजस्थानमध्ये चार जागांसाठी कॉंग्रेसचे तीन, भाजपचा एक आणि भाजप समर्थीत सुभाष चंद्रा अपक्ष असे पाच उमेदवार रिंगणात होते. यामुळे मुख्य लढत होती कॉंग्रेसचे प्रमोद तिवारी आणि सुभाष चंद्रा यांच्यात. 200 सदस्यांच्या विधानसभेत विजयासाठी 41 मतांची गरज होती. कॉंग्रेसचे फक्त 108 आमदार आहेत आणि तिघांच्या विजयासाठी 123 मतांची गरज होती. अशात, कॉंग्रेसचे रणदीप सुर्जेवाला यांना 43, मुकुल वासनिक यांना 42 आणि प्रमोद तिवारी यांना 41 अशी 126 मते मिळविण्यात अशोक गेहलोत यशस्वी झाले. यातही परसराम मोरडिया यांचे मत फेटाळण्यात आले. भाजपचे घनश्याम तिवारी यांना 43 मते मिळाली, तर चंद्रा यांना फक्त 30 मतांवर समाधान मानावे लागले. भाजपच्या शोभारानी यांचे मतसुद्धा कॉंग्रेसच्या उमेदवाराला मिळाले.
राजस्थानमध्ये अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यात छत्तीसचा आकडा आहे. यानंतरही पक्षाच्या आमदारांचे मन वळविण्यात गेहलोत यांना यश आले. हायकमांडने पाठविलेल्या तिन्ही नेत्यांना राज्यसभेत पाठविण्यात यश आल्यामुळे अर्थातच गेहलोत यांचे वजन वाढले आहे. संतप्त बीटीपी आणि अपक्ष आमदारांनीसुद्धा कॉंग्रेसच्या बाजूने मतदान केले.
निवडणुकीच्या 16 महिने आधी हे निकाल म्हणजे भाजपसाठी धोक्याची घंटा आहे. वसुंधरा राजे यांच्या निकटवर्तीय समजल्या जाणाऱ्या धौलपूरच्या आमदारांनी क्रॉस व्होटिंग करून पक्षातील गटबाजी आणखी मजबूत केली. निवडणुकीदरम्यान दिसणारे मिस मॅनेजमेंट येत्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठ्या बदलाचे संकेत देत आहे.
हरियाणात गेम
हरियाणात दोन जागांसाठी तीन उमेदवार रिंगणात होते. भाजपचे कृष्णलाल पवार, कॉंग्रेसचे अजय माकन आणि भाजपसमर्थीत अपक्ष कार्तिकेय शर्मा. 90 सदस्यांच्या विधानसभेत विजयासाठी 31 मतांची आवश्यकता होती. कृष्णलाल पवार यांना 36 मते पडली. अजय माकन यांच्या बाजूने 29 मते पडली, तर कार्तिकेय शर्मा यांना 23 मते मिळाली. पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये माकन आणि कार्तिकेय हे दोघेही विजयी आकडा गाठू शकले नाहीत. त्यामुळे दुसऱ्या पसंतीच्या मतांनी निर्णय घेण्यात आला. कृष्णलाल पवार यांना मतदान करणाऱ्या 36 आमदारांनी दुसऱ्या पसंतीचे मत कार्तिकेय यांना दिले. त्याचवेळी माकन यांना दुसऱ्या पसंतीची मते नव्हती.
दुसऱ्या क्रमांकाच्या मतांमुळे कार्तिकेय यांनी बाजी मारली. राज्यसभा निवडणुकीत आमदाराच्या मताचे मूल्य 100 मानले जाते. भाजपच्या 36 आमदारांनी कृष्णलाल पवार यांना प्रथम पसंती दिली. एका आमदाराची अनुपस्थिती आणि एकाचे मत रद्द झाल्यानंतर जिंकण्यासाठी आवश्यक मत मूल्य 2934 होते. पवार यांना मिळालेली अतिरिक्त मते कार्तिकेय शर्मांकडे हस्तांतरित झाली. कारण सर्व आमदारांनी कार्तिकेय यांना दुसऱ्या पसंतीची मते दिली होती. अशा स्थितीत कार्तिकेय यांना 666 इतकी अतिरिक्त मते मिळाली. त्यांच्या मतांची एकूण किंमत 2966 झाली, तर माकन यांना 2900 मते होती. अपक्ष आमदार बलराज कुंडू यांनी मतदान केले नाही. तर कॉंग्रेसच्या एका आमदाराचे मत फेटाळण्यात आले. अशा स्थितीत केवळ 88 सदस्यांची मते मोजण्यात झाली. कॉंग्रेसचे बंडखोर आमदार कुलदीप बिश्नोई यांनी क्रॉस व्होटिंग करून अजय माकन यांचा खेळ खराब केला.
कर्नाटकातील निकाल
कर्नाटकातील 4 जागांसाठी 6 उमेदवार रिंगणात होते. भाजपकडून 3, कॉंग्रेसकडून 2 आणि जेडीएसने 1 उमेदवार उभा केला होता. भाजपचे तिन्ही उमेदवार विजयी झाले. एक जागा कॉंग्रेसच्या वाट्याला गेली. 224 सदस्यीय विधानसभेत विजयासाठी उमेदवाराला 45 मतांची आवश्यकता होती. भाजपच्या निर्मला सीतारामन आणि कॉंग्रेसचे जयराम रमेश यांना 46-46 मते मिळाली.
भाजपचे जगेश यांना 44 तर लहरसिंग सिरोया यांना 36 मते मिळाली. 32 आमदारांसह जेडीएसचे कुपेंद्र रेड्डी यांना 30 मते मिळाली. त्यांच्या दोन आमदारांनी कॉंग्रेसचे दुसरे उमेदवार मन्सूर अली खान यांना मतदान केले. मन्सूर यांना अवघ्या 25 मतांवर समाधान मानावे लागले. भाजप सरकारसोबत 122 आमदार आहेत. त्यांना चार अतिरिक्त मते मिळाली. त्याचवेळी अपक्षांसह 70 आमदार असलेल्या कॉंग्रेसला केवळ 69 मते मिळाली. जेडीएसच्या दोन आमदारांनी त्यांच्या बाजूने मतदान केले. म्हणजेच कॉंग्रेसने जेडीएसमध्ये घुसखोरी केल्यावर भाजपला कॉंग्रेस छावणीचा पाठिंबा मिळाला.
युतीचे गणित बिघडले
महाराष्ट्रात 6 जागांसाठी भाजपचे 3, शिवसेनेचे 2, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने प्रत्येकी एक-एक असे 7 उमेदवार रिंगणात होते. यात केंद्रीय मंत्री पियुष गोयल, अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक यांनी बाजी मारली. कॉंग्रेसचे इम्रान प्रतापगढी, राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल आणि शिवसेनेचे संजय राऊत यांचाही विजय झाला. परंतु, शिवसेनेला संजय पवार यांना निवडून आणता आले नाही.