देहूगाव – जाऊ देवाचिया गावा। देव देईल विसावा।। देवा सांगू सुखदुःख। देव निवारील भूक।।
या संत तुकाराम महाराजांच्या अभंग उक्तीप्रमाणे भगवान परमात्मा पंढरीशी पांडुरंगाच्या भेटीसाठी गुरुवारी (दि. 1) जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या आषाढी वारी 336 व्या पालखी सोहळ्याने दुपारी सव्वादोनच्या सुमारास प्रस्थान ठेवले आहे. करोना संसर्ग रोखण्यासाठी यंदा ही मोजक्याच वैष्णवांच्या उपस्थितीत शासकीय नियमांचे पालन करत विठूरायाच्या नामगजरात भक्तिमय वातावरणात प्रस्थान ठेवले.
मंदिर आणि परिसरातील वातावरण टाळ, मृदुंग आणि नामघोषाने भक्तिमय बनले होते. या भक्तिमय वातावरणात तुकोबांची पालखी मंदिर प्रदक्षिणा करून भजनी मंडपात विसावली. नाकाबंदी, संचारबंदी आदेशामुळे देहूगावात येणाऱ्या सर्व रस्त्यांवर शुकशुकाट होता.
पालखी सोहळा जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचे सुपुत्र तपोनिधी नारायण महाराज यांनी 1685 मध्ये सुरू केला. यंदा वारीचे 336 वे वर्षे आहे. प्रस्थान सोहळ्याच्या निमित्ताने पहाटेपासून पालखी सोहळा प्रमुख, संस्थानचे अध्यक्ष, विश्वस्त, वंशज तसेच वारकऱ्यांची लगबग सुरू होती.
माऊलींच्या पालखीचे आज प्रस्थान
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांचा 336वा पालखी प्रस्थान सोहळा शुक्रवारी (2 जुलै) होणार असून, यासाठी मोजक्याच निमंत्रितांना आमंत्रित करण्यात आल्याचे पालखी सोहळा प्रमुख विकास ढगे पाटील यांनी सांगितले. शासकीय नियमांचे तंतोतंत पालन करून ही वारी आधार वारी म्हणून साजरी करण्याचे आवाहन पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी तमाम वारकरी बांधवांना केले आहे.