अकाली दलानेही नवज्योतसिंग सिद्धू यांना कोपरखळी हाणली आहे. अकाली दल म्हणतोय “जादो सिल्ली सिल्ली आंदी ए हवाये किथे कोई रोंदा होवेगा’.
चरणजीतसिंग चन्नी यांच्या नेतृत्वात विधानसभेची निवडणूक लढविणे कॉंग्रेसचा मोठा मास्टर स्ट्रोक म्हणायला हवा. कॉंग्रेसने ही खेळी खेळून पारंपरिक व्होटबॅंकसह दलित समाजाची मते मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. हा डाव यशस्वी झाला, तर निवडणूक खूपच रंजक झाल्याशिवाय राहणार नाही. सध्या आम आदमी पार्टी, कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा पंजाब लोक कॉंग्रेस आणि भाजप युती आणि अकाली दल-बसपा युती पंजाब विधानसभेच्या निवडणुकीत ताल ठोकून आहे. शेतकरी नेत्यांचा संयुक्त समाज मोर्चाचे उमेदवारही मैदानात उतरले आहेत. एकूणच काय तर पंजाबची निवडणूक आव्हानात्मक झाली आहे.
सध्या नवज्योतसिंग सिद्धू यांनी मवाळ भूमिका घेत हायकमांडचा निर्णय मान्य केला. आपण खुर्चीसाठी कधीही राजकारण केले नाही, असा त्यांनी दावा केला आहे. मुळात, राजकारण हा शक्यतांचा खेळ आहे. राजकारणात पदार्पण करणाऱ्यांनी वैयक्तिक महत्त्वाकांक्षा जोपासायला पाहिजेत आणि त्यात गैर नाही. कारण, आजच्या युगात महत्त्वाकांक्षेशिवाय कुणीही राजकारणात येत नाही. नवज्योतसिंग सिद्धू यांच्याही स्वतःच्या इच्छा आहेत; पंजाबचा मुख्यमंत्री होण्याची इच्छा बाळगण्यात काहीही गैर नाही. राजकारणात आपल्या अवतीभोवतीच्या लोकांचा “गेम’ करूनच राजकारणात पुढे जावे लागते. मात्र, सिद्धू यांनी ज्या पद्धतीचा अवलंब केला तो योग्य नाही.
आपल्या कट्टरतेमुळे अनेक वादात अडकलेल्या सिद्धू यांना परिपक्व राजकारण्याची प्रतिमा प्रस्थापित करणे कठीण झाले आहे. राजकारण हे केवळ वाक्प्रचार आणि धमक्या देऊन चालत नाही, तर त्यात गांभीर्यही असायला हवे. गुरू नानक देवजींच्या पवित्र स्थळाच्या दर्शनासाठी करतारपूर कॉरिडॉरची उभारणी सिद्धू यांनी केलेली मागणी नक्कीच प्रशंसनीय. पण इम्रानखान यांचे भरभरून कौतुक करणे या देशाला कधीही मान्य होणार नाही. आपण किती प्रामाणिक आहोत आणि दुसरे किती भ्रष्ट आहेत हेच सांगण्याचा प्रयत्न त्यांनी आतापर्यंत केला आहे.
दुसरीकडे, केंद्रीय संस्थेने चरणजीत सिंग यांच्या नातेवाईकांवर छापा टाकला आहे. ही आपल्यासाठी चालून आलेली संधी होय असं समजून सिद्धू यांनी चरणजीत चन्नी यांचा पत्ता साफ करण्यासाठी वक्तव्य द्यायला सुरुवात केली होती. एकीकडे, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यासोबतच्या मैत्रीचा देखावा करीत राहिले तर दुसरीकडे हायकमांडलाच धारेवर धरण्याचं काम त्यांनी केलं.
चरणजीतसिंग चन्नी यांनी नवज्योतसिंग सिद्धूंना मागे टाकले. नवज्योतसिंग सिद्धू हे बेदरकार सिद्ध झाल्यानेही हे घडले. हे सर्वविदित आहे की जो हायकमांडचं ऐकतो तोच मुख्यमंत्रिपदाचा संभावित दावेदार असतो. हायकमांडला धमकी देणारा किंवा डोळे दाखविणारा मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार कसा काय होणार, ही बाब सिद्धू यांनी समजून घ्यायला हवी होती. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे पंजाबमध्ये 32 टक्के दलित मते आहेत आणि पंजाबमध्ये आम्ही एक दलित मुख्यमंत्री बनविला असा प्रचार कॉंग्रेस करीत आहे. चन्नी यांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा बनवून कॉंग्रेसने मास्टर स्ट्रोक खेळला यात दुमत नाही.
पंजाबच्या राजकारणात जाट शीख मतदारांची संख्या 18 टक्के आहे आणि राज्यात आतापर्यंत जाट शिखांचे वर्चस्व राहिले आहे. कॉंग्रेस हायकमांडला सिद्धूची वृत्ती मवाळ करण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागले आहेत. दुसरीकडे चन्नी शांत स्वभावाने रात्रंदिवस एक होऊन लोकांमध्ये जात असल्याने त्यांची स्वीकारार्हता वाढली आहे. मात्र, सर्व विरोधकांना बरोबर घेऊन पुढे जाण्याचे आव्हान चन्नी यांच्यासमोर आहे. आता नवज्योतसिंग सिद्धू दुसऱ्या पक्षात जाणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. सध्या तरी तसे होण्याची शक्यता नाही. सुखवीर बादल आणि विक्रम मजिठिया यांच्यामुळे सिद्धू यांनी भारतीय जनता पक्षाला रामराम ठोकला होता. शिवाय “आप’सोबत वाटाघाटी करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. परंतु तोही फसला. आता आपने भगवंत मान यांना मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार घोषित केले आहे.
शेतकऱ्यांच्या आघाडीकडून सिद्धू यांना कोणतीही आशा नाही. विक्रम मजिठिया यांनी सिद्धू यांच्यासमोर तगडे आव्हान ठेवले आहे. पंजाबमध्ये जनादेश कसा असेल हे जनता ठरवेल. सध्या सिद्धू लोकांचे मनोरंजन करत आहे, त्यांनी ते करत राहावे कारण सद्यस्थितीत त्यांच्यासमोर कोणताही पर्याय नाही.
गोव्यात पक्षांतर न करण्याची शपथ
गोवा आपणच जिंकू, याची कॉंग्रेसला खात्री आहे. परंतु, भारतीय जनता पक्षाने मागच्या निवडणुकीनंतर जे काही केलं होतं ते पुन्हा करणार नाही, याचा कॉंग्रेसला विश्वास नाही. 2017 च्या निवडणुकीत गोव्यात कॉंग्रेस पक्षाचे सर्वाधिक 17 आमदार निवडून आले होते. परंतु, भाजपनं कॉंग्रेसच्या विजयी आमदारांना फोडून आपल्या पक्षात आणलं होतं आणि भाजपनं सरकार स्थापन केले होते. याचीच पुनरावृत्ती पुन्हा होईल, अशी भीती कॉंग्रेसला सतावत आहे. कदाचित म्हणूनच, निवडणुकीत विजय मिळविल्यानंतर आपण पक्षांतर करणार नाही, अशी शपथ कॉंग्रेस पक्ष प्रत्येक उमेदवाराला घ्यायला लावत आहे. महत्त्वाचे म्हणजे, भारतात पक्षांतरविरोधी कायदा कडक असताना ही स्थिती पाहावयास मिळत आहे.
लोकशाहीत जेव्हा एखादा उमेदवार एखाद्या राजकीय पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवून जिंकतो, तेव्हा त्याने आपला राजकीय धर्म पाळावा आणि वैयक्तिक फायद्यासाठी पक्षांतर करू नये, अशी लोकांची अपेक्षा असते, परंतु अशा प्रकारचा अवलंब केला जातो.
वंदना बर्वे