– वंदना बर्वे
विधानसभेच्या सात जागांवर झालेल्या पोटनिवडणुकीचा निकाल भारतीय जनता पक्षाला सावधगिरीचा इशारा देणारा आहे. यूपीतील घोसीचा निकालानंतर निवडणुकीची रणनीती ठरविणाऱ्या भाजपच्या मंडळींना दिवसा तारे दिसले नसतील तरच नवल!
पश्चिम बंगाल, केरळ, उत्तराखंड, झारखंड, त्रिपुरा आणि उत्तर प्रदेश या सहा राज्यांत ही निवडणूक झाली होती. यात तीन जागांवर भाजपचा विजय झाला तर चार जागा विरोधी पक्षांची आघाडी “इंडिया’ला मिळाल्यात. भाजपने ज्या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे ती अशी की, पोटनिवडणूक मग ती कोणतीही असो लोकसभेची वा विधानसभेची. ही निवडणूक ज्या राज्यात होत आहे तेथे ज्या पक्षाचं सरकार असते त्याच पक्षाचा उमेदवार विजयी होतो, अशी एक परंपरा आहे. या निवडणुकीतही हीच परंपरा कायम असल्याचे दिसून आले. उत्तराखंड आणि त्रिपुरामध्ये भाजपचे सरकार आहे. येथील बागेश्वर आणि बॉक्सानगर तसेच धनपूर या ठिकाणी भाजपचे उमेदवार विजयी झाले. याशिवाय, पश्चिम बंगालमधील धुपगुरीची जागा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या पक्षाने जिंकली. केरळमधील पुथुपल्लीची जागा कॉंग्रेसला मिळाली. झारखंडमधील डुमरी येथेही सत्ताधारी पक्षाचा विजय झाला. मात्र, उत्तर प्रदेशात भाजपचे सरकार आहे. योगी आदित्यनाथ मुख्यमंत्रिपदी आहेत. यूपी आणि गुजरात अशी राज्ये आहेत जिथे भाजपची मजबूत पकड आहे, असं समजलं जातं. यानंतरही उत्तर प्रदेशातील घोसी मतदारसंघात भाजपच्या उमेदवाराचा पराभव झाला आहे. हा पराभव भाजपच्या डोळ्यात अंजन घालणारा आहे.
आदित्यनाथ यांची उत्तर प्रदेशावर मजबूत पकड आहे. ही पकड आता सैल झाली की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. घोसीमध्ये समाजवादी पक्षाच्या उमेदवाराचा विजय झाला. इंडिया आघाडीने जसे निश्चित केले आहे की भाजपच्या उमेदवाराविरुद्ध विरोधी पक्षांनी एकच उमेदवार उतरवायचा त्याप्रमाणे घोसीमध्ये कॉंग्रेस आणि अन्य पक्षाने उमेदवार उतरविला नव्हता. सपाला पूर्ण पाठिंबा दिला होता. त्यामुळे आता ही जागा सपाच्या ताब्यात आली आहे. याचा सर्वात मोठा संदेश म्हणजे मतदारांनी आता जुन्या जातीय समीकरणातून मुक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. कारण घोसी येथील सपाचे उमेदवार सुधाकर सिंह हे ठाकूर आहेत तर भाजपचे उमेदवार दारा सिंह चौहान हे मागास जातीचे मानले जातात. याचा अर्थ असाही लावता येईल की, मतदार जातीच्या पलीकडे जाऊन विचार करू लागला आहे.
आता, यूपीच्या घोसीत सपा विजयी झाली असली तरी हा विजय “इंडिया’चा आहे असा प्रचार विरोधी पक्षांकडून केला जाऊ शकतो. भाजपच्या “एनडीए विरुद्ध इंडिया’ने ही निवडणूक जिंकली आहे. यामुळे विरोधी पक्षांचे मनोबल वाढले आहे. पश्चिम बंगालच्या धुगपुरीची जागा दीदीच्या पक्षाने जिंकली आहे. तेथे त्यांचे सरकार आहे म्हणून दीदी जिंकल्या असं म्हणता येईल. परंतु, या मतदारसंघात दीदी विजयी झाल्याचे विश्लेषण करणे भाजपसाठी खूप महत्त्वाचे आहे. कारण, ही जागा भाजपच्या ताब्यात होती. भाजपला पराभूत करून तृणमूल कॉंग्रेसने ही जागा जिंकली आहे. पोटनिवडणुकीचा निकाल त्या त्या राज्यातील लोकांची भावना दाखविणारा आहे, असे अजिबात म्हणता येणार नाही. परंतु हातावर हात ठेवून बसताही येणार नाही हेही तेवढंच खरं आहे. सपाने भाजपला पराभूत करून घोसीची जागा जिंकली असेल तर भाजपसाठी चिंतेचे कारण आहे. कारण, देशाच्या सत्तेचा मार्ग यूपीतून जातो कारण येथे लोकसभेच्या तब्बल 80 जागा आहेत.
पोटनिवडणुकीचे निकाल आणखी एका कारणामुळे महत्त्वाचे आहेत आणि ते म्हणजे हा निकाल पुढील दोन-तीन महिन्यांत पाच राज्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आला आहे. ज्या पाच राज्यांत निवडणूक होणे आहे त्यात भाजपशासित मध्य प्रदेश आणि मिझोरम, कॉंग्रेसशासित राजस्थान आणि छत्तीसगड, भारत राष्ट्र समितीशासित तेलंगणा यांचा समावेश आहे. या पाच राज्यांच्या निवडणुकीत केंद्रातील रालोआ आणि विरोधी आघाडी “इंडिया’ यांच्यात काट्याची टक्कर होईल असेच दिसून येते. निवडणूक समीकरणांचा संबंध बघता असे म्हणता येईल की, 2024 च्या लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून 28 विरोधी पक्षांची आघाडी “इंडिया’ तयार करण्यात आली आहे. त्यामुळे या पाच राज्यांमध्ये भाजप आणि कॉंग्रेस यांच्यात थेट लढत होणार आहे. पोटनिवडणुकीच्या आधारे कोणताही निश्चित निष्कर्ष काढता येणार नसला तरी इंडिया आघाडी आणि भाजपची एनडीए आघाडी यांच्यात चार-तीन असे समीकरण नक्कीच आहे. पण यालाच लोकशाही म्हणतात ज्यात कोणत्याही राजकीय पक्षाचे समर्थक बदलत राहतात.
त्यामुळे भाजप आणि कॉंग्रेस दोन्ही पक्ष याला आपापल्या आघाडीचा विजय म्हणत आहेत. पण राज्यपातळीवर दोन्ही आघाड्यांमध्ये खरी लढत डिसेंबर महिन्यात होणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीतच पाहायला मिळणार आहे. मात्र, पोटनिवडणुकीच्या निकालाला पोटनिवडणुकीपुरतंच ठेवून भाजप स्वस्थ बसणार नाही. कारण, भाजपचं सगळं गणित लोकसभेच्या निवडणुकीला धरून असतं. एखादी घटना घडली तर त्या घटनेचा लोकसभेच्या निवडणुकीवर कोणता परिणाम होईल? याचं गहन विश्लेषण केल्याशिवाय भाजप स्वस्थ बसत नाही. भाजपसाठी चिंतेचे कारण असं की, गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेच्या निवडणुकीत यूपीतील सर्व 80 जागांवर विजय मिळविणार असल्याचे म्हटले आहे. अशात, यूपीत भाजपचे सरकार असताना, मुख्यमंत्रिपदावर योगी आदित्यनाथ असताना घोसीमध्ये भाजपचा पराभव होतो ही बाब पायाखालची जमीन सरकवणारी नक्कीच आहे.
भाजपकडून यूपीतील सर्व 80 लोकसभा जागा जिंकण्याची घोषणा केली आहे. यास एक राजकीय घोषणा म्हणता येईल. भाजप वर-वर जरी 80 जागांचा दावा करीत आहे तरीसुद्धा आपल्याला सर्वच जागा जिंकता येणार नाही, याची जाणीव भाजपच्या मनात आहे. जागा वाढविण्याकरिता रणनीतीकारांकडून वेगवेगळ्या युक्त्या लढविल्या जात आहेत. परंतु, पाहिजे तसे यश मिळताना त्यांना दिसत नाही आहे. मुस्लीम भागात भाजप नेहमीच कमजोर राहिला आहे. शिवाय, कितीतरी विद्यमान खासदारांवर यूपीची जनता नाराज असल्याची चर्चा आहे. अशा खासदारांचं काय करायचं? हा प्रश्न भाजप हायकमांडला पडला आहे आणि त्यांच्याकडे याचं उत्तरसुद्धा आहे. भाजपच्या अंतर्गत सर्वेक्षणातही या सर्व बाबी समोर आल्या आहेत.म्हणूनच गुजरातच्या धर्तीवर यूपीतील विद्यमान खासदारांचे तिकीट मोठ्या प्रमाणावर कापले जाणार असल्याची चर्चा आहे. भाजपच्या अंतर्गत सर्वेक्षणात जवळपास 16 जागा अशा आढळून आल्या आहेत, जिथे पक्षाची स्थिती खूपच कमकुवत आहे. या जागा जिंकण्यासाठी भाजपला डबल ताकद लावावी लागणार आहे. तिकीट कापली जाणार असल्याची भनक लागल्यामुळे खासदारांच्या वर्गाकडून “गॉडफादर’ला प्रदक्षिणा घालण्यास सुरुवात झाली आहे.