कवठे -वाई तालुक्यात तीन दिवसांपासून करोनाची रुग्णसंख्या घटत असली तरीही नागरिकांनी बेजबाबदारपणे वागून करोनाला निमंत्रण देऊ नये, असे आवाहन प्रशासकीय अधिकाऱ्यांनी केले आहे.
वाई तालुक्यातील महसूल, पोलीस, आरोग्य, सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, आशाताई, गावकामगार तलाठी यांच्यासह ग्रामसेवक, कोतवाल, पोलीस पाटील आणि ग्रामरक्षक समित्या या सर्वांनी एकत्र येवून समन्वयाने काम केल्याने शहरासह तालुक्यातील गावागावामध्ये करोनाला आळा घालण्यात यश येऊ लागले आहे. वाई तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून यापूर्वीच्या तुलनेत करोना प्रसार घटल्याचे स्पष्ट होत आहे.
रविवारी रात्रीच्या अहवालात तालुक्यात 19 रुग्ण आढळले आहेत. आजअखेर वाई शहरामध्ये 1111 तर तालुक्यातील गावांमध्ये 2266 करोना रुग्णसंख्या असून त्यात 95 नागरिकांना उपचारादरम्यान आपले प्राण गमवावे लागले आहेत. तालुक्यात 117 गावे असून यापैकी 72 गावांमध्ये आढळत होते.
दिवसेंदिवस करोना रुग्णसंख्येमध्ये हाणारी वाढ प्रशासनाच्या दृष्टीने चिंताजनक बाब बनत होती. गांभीर्य लक्षात घेऊन वाईच्या प्रांताधिकारी संगीता राजापूरकर- चौगुले, तहसीलदार रणजीत भोसले, गट विकास अधिकारी उदय कुसुरकर, तालुका वैद्यकीय अधिकारी संदीप यादव, वाईच्या मुख्याधिकारी विद्या पोळ, वाईचे उपअधीक्षक अजित टिके, पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे, सहायक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे, भुईंज पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शाम बुवा, उपनिरीक्षक संजय मोतेवार या सर्व प्रशासन अधिकाऱ्यांनी एकत्र बैठक घेतली.
पोलीस प्रशासनाने विनामास्क आणि अनावश्यक फिरणाऱ्यांवर कारवाई सुरू केली. आमदार मकरंद पाटील यांनी पुढाकार घेऊन प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या सोबतीने वाई तालुक्यातील जवळपास 75 गावे तीन तीन वेळा पिंजून काढली. करोनोचा फैलाव रोखण्यासाठी नागरिकांची काय अडचण आहे, प्रशासनाला नागरिक का मदत करीत नाहीत, याबाबत अधिकाऱ्यांसमोर गावागावात चर्चा केली.
नागरिकांवर तातडीने औषधोपचारांची सोय व्हावी, यासाठी वाई शहरातील अनेक खासगी रुग्णालये ताब्यात घेऊन या रूग्णालयामध्ये 250 ते 300 बेड उपलब्ध करून दिले. त्यामुळे नागरिकांना वेळेत उपचार होऊ शकले. गेल्या तीन दिवसांपासून करोना रुग्णसंख्या कमी होत गेली असली तरी नागरिकांनी बेजबाबदार वागून करोनाला निमंत्रण देऊ नये, असे आवाहन प्रशासनातील अधिकाऱ्यांनी केले आहे.