अनधिकृत बांधकामाची तक्रार करूनही दुर्लक्ष : कारवाईचे आदेश
राजगुरूनगर – राजगुरूनगर शहरातील हुतात्मा राजगुरू महाविद्यालयासमोर पुणे-नाशिक महामार्गालगत नव्याने होत असलेल्या अनधिकृत बांधकामाची अनेकदा तक्रार करूनही दखल घेत नसल्याबद्दल राजगुरूनगर नगरपरिषदेला मुंबई उच्च न्यायालयाने दणका दिला आहे.
तक्रारदार सुभाष भागोजी कानवडे यांनी राजगुरूनगर नगरपरिषद प्रशासनाला अनेकदा लेखी पत्रे दिली मात्र त्याला दाद न दिल्याने तक्रारदाराने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. तक्रारदार सुभाष भागोजी कानवडे यांच्या वतीने ऍड. अक्षय पेटकर आणि स्थानिक ऍड. निलेश आंधळे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर 1 ऑक्टोबरला आदेश देण्यात आला. याचिकेवर 18 ऑक्टोबरला सुनावणी घेऊन तातडीने निर्णय घेऊन कारवाई करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.
राजगुरूनगर नगरपरिषद हद्दीतील गट क्र. 314/ 1 व 3 मध्ये पुणे-नाशिक महामार्गा लगत, खेड पोलीस ठाण्या शेजारी, दर्शनी भागात चार मजली व्यापारी संकुल होत आहे. काम अंतिम टप्प्यात आहे; मात्र या इमारतीच्या जागेबाबत तक्रारदार कानवडे यांनी नगरपरिषद प्रशासनाला अनेकदा लेखी पत्र दिले. जागेसह बांधकाम परवानग्या व प्रत्यक्षात होणारे काम यात तफावत आहे. अगस्ती डेव्हलपर्स या विकसकाने 12 गुंठे क्षेत्र बिगरशेती करून एकूण 24 गुंठ्यांत बांधकाम नकाशाला मंजुरी मिळवली आहे. याशिवाय इमारत उभी राहात असलेल्या पैकी काही जागा हुतात्मा राजगुरू स्मारकासाठी आरक्षित असून त्यात अतिक्रमण झाल्याचा आरोप केला आहे.
याचिकाकर्त्यांनी फेब्रुवारी 2020पासून केलेल्या मागणी, तक्रारीची दखल नगरपरिषद प्रशासनाने घेतली नाही. त्यामुळे त्याने न्यायालयात धाव घेतली होती. शहरात अशी अनेक बेकायदेशीर कामे होत आहेत. मात्र त्याकडे नगरपरिषद सोयीस्कर दुर्लक्ष करीत असते. कारवाईबाबत अधिकारी सुस्त असतात. न्यायालयाच्या आदेशाने आता कारवाई करावी लागणार आहे. शिवाय यापुढेही अशा तक्रारींची दखल घ्यावी लागणार आहे. नगरपरिषद सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारीची दखल घेत नसल्याचे यावरून मात्र स्पष्ट झाले आहे.
दहा दिवसांपूर्वी आमच्या सक्षम अधिकाऱ्यांनी संबंधित कामावर प्रत्यक्ष जाऊन नगरपरिषदेचा पुढील आदेश येईपर्यंत काम बंद ठेवण्याचा तोंडी आदेश दिलेला आहे. हे अधिकारी करोनाची लागण झाल्याने लेखी आदेश अद्याप दिला नाही. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार सुनावणी घेऊन पुढील कारवाई करण्यात येईल.
– प्रकाश पाटील, मुख्याधिकारी राजगुरूनगर नगरपरिषद