शिरूरमध्ये पाणीपातळी सर्वाधिक खोल : जलपातळी तीन फुटांनी घटली
गणेश आंग्रे
पुणे – यंदा अपुरा पडलेला पाऊस, परतीच्या पावसाने फिरवलेली पाठ यामुळे जिल्ह्यातील भूजल पातळीत सरासरी 3 फुटाने घट झाली आहे. भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेने केलेल्या पाहणीत जिल्ह्यातील 13 पैकी 12 तालुक्यांमधील पाणीपातळीत 0.82 ते 7.57 फूट इतकी घट झाल्याचे निदर्शनास आले आहे. यामध्ये भूजल पातळीत सर्वाधिक घट शिरूर तालुक्यात नोंदविण्यात आली असून या तालुक्यात 7.57 फुटाने पाणी पातळी खोल गेली आहे. एकदंरच भूजल विभागाच्या या निरीक्षणावरून यंदा उन्हाळ्यात पाणीटंचाई अधिक जाणविण्याची शक्यता आहे.
भूजल सर्वेक्षण यंत्रणेमार्फत दर तीन महिन्यांनी भूजल पातळीच्या नोंदी घेतल्या जातात. या नोंदीतून जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील भूजल पातळीत झालेली वाढ, तसेच घट समजते. भूजल पातळीचा अभ्यास करण्याकरिता प्रत्येक पाणलोट क्षेत्रात तीन निरीक्षण विहिरी या प्रमाणे जिल्ह्यात 182 निरीक्षण विहिरी निश्चित केल्या आहेत. यात काही कूपनलिकांचा समावेश आहे.
पाणलोट क्षेत्रांनुसार भूजल नोंदणीची ठिकाणे ठरविली जातात. या कूपनलिकामधील पाण्याचा उपसा केला जात नाही. भूजल विभागाने सप्टेंबर महिन्यात घेतलेल्या नोंदीत जिल्ह्यातील भूजल पातळीत घट झाल्याचे दिसून आले आहे.
केवळ जुन्नर तालुक्यात पाणीपातळीत वाढ
मागील पाच वर्षांपूर्वी सप्टेंबर महिन्यात भूजल पातळीत तब्बल 7.80 फुटाने वाढ झाली होती. यंदा मात्र पाच वर्षांच्या तुलनेत जिल्ह्यात 3.08 फुटाने पाणीपातळी खोल गेली आहे. यंदा फक्त जुन्नरमध्ये पाणीपातळीत वाढ झाल्याचे दिसून आले असून 1.80 फुटाने पाणीपातळी वाढलेली आहे. पाणीपातळीत सर्वाधिक घट ही शिरूरमध्ये झाली असून ता तालुक्यात 7.57 फुट, त्यानंतर इंदापूरमध्ये 7.51 फूट, बारामतीमध्ये 6.82 फूट, पुरंदरमध्ये 5.77 फूट पाणीपातळीत घट झाली आहे.