नगर -देशसेवेचे स्वयंशिस्तीचे धडे जवानांना सीमेवर मिळतात तेच धडे ग्रामसेवेसाठी कामी आले तर पर्यावरण, पाणी, ग्रामसुरक्षा, स्वच्छता, व्यसनमुक्ती या सर्व क्षेत्रामध्ये प्रत्येक गावात भरीव, असे काम होईल. अशा संघटना प्रत्येक गावात झाल्या तर देश बलशाली झाल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन आदर्श गाव हिवरे बाजार चे सरपंच पोपटराव पवार यांनी केले.
भोयरे पठार व खुर्द या दोन्ही गावामधील आजी माजी सैनिकांनी एकत्र येऊन भैरवनाथ सैनिक संघटना स्थापन करण्यात आली. या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जयहिंद सेवा संघटनेचे अध्यक्ष शिवाजी पालवे, उद्योजक शिवा बोरकर, संजय मुठे, उपाध्यक्ष नानासाहेब वाठोळे, सचिव रामदास टकले, बबन टकले, विजय उरमुडे, भाऊसाहेब उरमुडे, बबन उरमुडे, प्रकाश मुठे, गिरीधर आंबेकर, राजू उरमुडे आदी उपस्थित होते.
यावेळी पवार म्हणाले, नगर तालुक्यातील दोन्ही गावातील ग्रामस्थाच्या सहकार्यातून आजी माजी संघटनेने भैरवनाथ संघटनेची स्थापना केली ही आनंदाची बाब आहे. देशाचे संरक्षण करुन निवृत्त झाल्यानंतर गावाकडे आल्यावर गावाचे संरक्षण करण्यासाठी माजी सैनिकनी हा उपक्रम सुरु केला आहे. देशसेवा व ग्रामसेवा यांच्या माध्यमातून गाव एकत्रीत आले तर गाव स्वंयशिस्त स्वयंपूर्त होईल.