पूरग्रस्तांना मिळणार नुकसान भरपाई
बॅंक खात्यात जमा होणार पैसे
पिंपरी – पूरग्रस्त स्थितीमुळे नुकसान झालेल्या रहिवाशांची माहिती घेण्यास पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सुरुवात करण्यात आली आहे. त्यानुसार त्या रहिवाशांचे कपडे, धान्य व इतर वस्तुंच्या नुकसानीबाबत पंचनामा करण्यात येत आहे. संबंधित परिसरातील मंडल अधिकारी आणि तलाठी यांचे पथक कार्यरत आहे. लवकरात लवकर त्याची माहिती घेऊन बॅंक खात्यात पैसे जमा करण्याची कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती अप्पर तहसीलदार गीता गायकवाड यांनी दिली.
पाणी ओसरल्याने नदीच्या पाण्यामुळे दापोडी, नवी सांगवी, सांगवी, बोपोडी, पिंपरी या परिसराला फटका बसला आहे. याची माहिती घेण्यास सुरुवात झाली आहे. काही भागात उद्यापासून (गुरुवार) माहिती संकलन सुरु करण्यात येणार आहे. रहिवाशांचे पाण्यामुळे झालेले नुकसान, संसरपयोगी साहित्य, इतर वस्तू तसेच अन्न-धान्याचे झालेले नुकसान याची माहिती घेण्यात येत आहे.
पंचनामे झाल्यानंतर बॅंक खात्याची माहिती घेऊन सानुग्रह अनुदान अडीच ते पाच हजार आणि शासनाच्या धान्य दुकानातून धान्य उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्यानुसार तलाठी, कोतवाल आणि मंडल अधिकारी या पथकाच्या माध्यमातून पंचनामा करण्यात येत आहे. माहिती संकलित करुन प्रथम संबंधितांच्या खात्यावर रक्कम जमा केली जाईल, असे तहसीलदार गायकवाड यांनी सांगितले.