मुंबई – मुंबई जवळील समुद्रात बॉम्बे हाय मध्ये काम करणाऱ्या तंत्रज्ञांना व कामगारांना वादळाच्या धोक्याचा इशारा देण्यात येऊन सुद्धा त्यांना सुरक्षितपणे किनाऱ्यावर आणले गेले नाही, या दुर्घटनेला तेल आणि भूगर्भवायू महामंडळ म्हणजेच ओएनजीसीच जबाबदार असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. या प्रकरणी पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान हे राजीनामा देणार काय असा सवालही शिवसेनेने उपस्थित केला आहे.
पक्षाच्या मुखपत्रात हा सवाल करण्यात आला आहे.तेथे ज्या कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे तो त्यांचा नैसर्गिक आपत्तीतील मृत्यू नाहीं तर हा सदोष मनुष्यवधाचाच प्रकार आहे असेही शिवसेनेने म्हटले आहे. ओएनजीसीने वादळाचा इशारा गंभीरपणे घेतला नाही म्हणून या लोकांना त्यांचे प्राण गमवावे लागले आहेत असे शिवसेनेचे म्हणणे आहे.
ओएनजीसीच्या कामासाठी खोल समुद्रात गेलेली पी-305 ही बार्ज चक्रीवादळामुळे बुडाली. त्या दुर्घटनेत 60 जण मरण पावले आहेत. शिवसेनेने म्हटले आहे की या चक्रीवादळाची पुर्व कल्पना खूप आधीच मिळाली होती. पण त्याकडे ओएनजीसीने पुर्ण दुर्लक्ष केले. तेथे काम करीत असलेल्या सातशे कर्मचाऱ्यांना ओएनजीसीने त्वरीत माघारी बोलवायला हवे होते पण त्यांनी ते केले नाही. त्यातून ही दुर्घटना घडली आहे. त्याची पेट्रोलियम मंत्र्यांनी नैतिक जबाबदारी घेतली पाहिजे असेही शिवसेनेने म्हटले आहे.