पुणे – राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होताना उद्धव ठाकरे यांनी “मी मुख्यमंत्री होणार नाही’ अशीच भूमिका घेतली. तसेच शिवसेनेतर्फे वाटाघाटीचे सर्व अधिकार एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई यांना दिले. तरीही, शिंदे यांनीच उद्धव ठाकरेंचा विश्वास घात केला, असा आरोप काॅंग्रेसचे प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी मंगळवारी केला.
महाविकास आघाडीतर्फे आयोजित पत्रकार परिषदेत ठाकरे बोलत होते. ” महाविकास आघाडीची चर्चा सुरू असताना आपण स्वत: काॅग्रेसचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होतो. सरकार स्थापन झाल्यानंतरही शिंदे हेच सर्व निर्णय घेत होते. असे असताना विश्वासघात करण्यात आला. ठाकरे यांचा पक्ष आणि चिन्ह चोरले. शिवसेनेच्या फुटीनंतर एकनाथ शिंदे हे उध्द्वव ठाकरेंवर महाविकास आघाडीत जाण्याबाबत टीका करत आहेत. पण, शिंदे यांनी विश्वासघात केला,’ असा पुनरुच्चार ठाकरे यांनी केला.
अजित पवार हे भाजपचे मोहरे
राष्ट्रवादी काॅंग्रेस एकसंघ असताना अजित पवार स्वत: काँग्रेसबरोबर जागावाटपाच्या चर्चा करताना ते निर्णय घ्यायचे. आता त्यांना भाजपकडे जागा मागाव्या लागत आहेत. लोकसभेच्या चार उमेदवारांपैकी दोन भाजपने दिलेले उमेदवार आहेत. तर, बारामतीमध्ये घरातील उमेदवार भाजपने द्यायला लावला. त्यामुळे अजित पवारांना आता स्वत: निर्णय घेण्याचा अधिकार राहिलेला नाही. ते भाजपचे मोहरे बनले आहेत, असेही ठाकरे म्हणाले.