नवी दिल्ली :- एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक स्पर्धेत भारतीय संघात रवीचंद्रन अश्विनची निवड झाल्यावर अनेकांनी टीकेचा सूर लावला असला तरीही माजी आंतरराष्ट्रीय ऑफ स्पीन गोलंदाज हरभजनसिंगने त्याच्या निवडीचे समर्थन केले आहे.
ही स्पर्धा यंदा भारतात होत असल्याने फिरकीला साथ देणारी खेळपट्टी बहुतेक प्रत्येक सामन्यात पाहायला मिळेल. त्यासाठी संघात केवळ दोनच वेगवान गोलंदाज खेळवले जावे. रवींद्र जडेजा, कुलदीप यादव यांच्यासह अश्विनलाही संघात खेळवले गेले पाहिजे. ऑस्ट्रेलियासह अनेक संघात डावखुरे फलंदाज जास्त आहेत, त्यामुळे अश्विनचा अंतिम अकरा खेळाडूंमध्ये समावेश असणे गरजेचे आहे. मी जर कर्णधार असतो तर त्याला स्पर्धेतील एकाही सान्यासाठी वगळले नसते, असेही हरभजन म्हणाला.
डावखुरा फिरकी गोलंदाज अक्सर पटेलला दुखापत झाल्यामुळे त्याला या स्पर्धेला मुकावे लागणार असल्याने अगदी आयत्यावेळी अश्विनचा संघात समावेश केला गेला आहे.
दरम्यान, भारताचा ऑफ स्पीन गोलंदाज रवीचंद्रन अश्विन हा अत्यंत स्वार्थी खेळाडू आहे. त्याचा भारताच्या एकदिवसीय संघात समावेश केल्यावर संघाला सातत्याने यश मिळेल हा खूप मोठा गौरसमज आहे, अशी बोचरी टीका भारताचे माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू व समालोचक लक्ष्मण शिवरामकृष्णन यांनी केली होती. केवळ वैयक्तीक कामगिरी सुधारावी व प्रत्येक सामन्यात खेळपट्टी आपल्याच गोलंदाजीला मदत करणारी ठरावी असा त्याचा हट्ट असतो. अक्सर पटेल जर तंदुरुस्त ठरला असता तर त्यालाच विश्वकरडंकसाठी संघात स्थान दिले गेले असते. केवळ पटेल दुखापतग्रस्त असल्याने अश्विनला संधी मिळाली यात त्याचे वैयक्तीक कतृत्व काहीही नाही, असेही शिवरामकृष्णन यांनी म्हटले होते.
अश्विनची वनडे सामन्यातील कारकीर्द…..
अश्विनने टीम इंडियासाठी 115 वनडे सामने खेळले आहेत. या 115 सामन्यांमध्ये अश्विनने 4.95 च्या इकॉनॉमी आणि 33.2 च्या सरासरीने 155 विकेट घेतल्या आहेत. 25 धावांत चार विकेट, ही अश्विनची वनडेतील सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे. त्याशिवाय गरज पडल्यास आर. अश्विन फलंदाजीतही योगदान देऊ शकतो. अश्विनने वनडेमध्ये 86.96 च्या स्ट्राइक रेटने आणि 16.44 च्या सरासरीने 707 धावा केल्या आहेत.
एकदिवसीय विश्वचषकासाठी भारतीय संघ – रोहीत शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, के एल राहुल, ईशान किशन, सुर्यकुमार यादव, रवींद्र जाडेजा, कुलदीप यादव, रवीचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमरा, महम्मद सिराज, शार्दूल ठाकूर व महम्मद शामी.