औरंगाबाद – शिवसेनेच्या 40 आमदारांच्या बंडखोरीनंतर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. मात्र, महाविकास आघाडी सरकार कोसळण्याआगोदर या सरकारने मंत्रीमंडळ बैठका घेत काही निर्णय घेतले होते. यात औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव असे नामकरण करण्यासह नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव दिले होते. मात्र, महाविकास आघाडीचे सरकार कोसळले आणि शिवसेनेतून फुटलेल्या शिंदे गटाने भाजपसोबत राज्यात सत्ता स्थापन केली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अल्पमतातील माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारने नामांतराचा निर्णय घाई गडबडीत घेतल्याचे सांगत रद्द केला होता.
दरम्यान, औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचा नामांतराच्या प्रस्तावाला शिंदे-फडणवीस सरकराने पुन्हा एकदा मंजुरी दिली आहे. त्यांच्या या निर्णयावरून अनेक राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनीसुद्धा प्रतिक्रिया दिली आहे.
जलील म्हणाले, शिवसेना असो की भाजप सर्वांनीच राजकीय फायद्यासाठी महापुरुषांच्या नावांचा वापर केला आहे. औरंगाबादचे नामांतर करून छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देण्याची घोषणा त्याचेच एक उदाहरण आहे. त्यातच राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षालासुद्धा ऐतिहासिक शहराच्या नामांतराचे श्रेय हवे होते, अशी टीका जलील यांनी केली.
लाल सिंग चड्डाच्या स्क्रिनिंगवेळी आमिर खानला अश्रू अनावर, चिरंजीवीला मारली मिठी
जलील म्हणाले, आता हे पक्ष औरंगाबादच्या जनतेला दर आठ दिवसांऐवजी रोज पाणी कधी देणार याबाबत सांगू शकतील का?, आता तरुणांना नोकऱ्या कधी मिळतील?, तसेच हे पक्ष आमचे क्रीडा विद्यापीठही परत आणतील का?, इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्चर केव्हा मिळेल?, आमचे पासपोर्ट, आधार, पॅन, शैक्षणिक कागदपत्रे बदलण्यासाठी कुणाकडून शुल्क आकारले जाईल हेही सरकार सांगितले पाहिजे. त्यामुळे आज रस्त्यावर नाचणारे हे सगळे लोकं रांगेत उभे राहून सर्वसामान्यांची कामे करून देतील का?, औरंगाबादला फक्त नावाची नाही तर विकासाची गरज असल्याची टीका जलील यांनी यावेळी केली.