मुंबई/नाशिक : आखाती देशांतील युद्धामुळे लाल समुद्रातील मालवाहतूक बंद झाल्याने नाशिक जिल्ह्यातील द्राक्षांची युरोप, अमेरिकेतील निर्यात चारपट महागली आहे. त्याचा द्राक्ष उत्पादकांना मोठा फटका बसत असून, द्राक्षांना योग्य दर मिळत नसल्याने उत्पादकांपुढील अडचणी वाढल्या आहेत.
नाशिक जिल्ह्यातून दरवर्षी एकूण उत्पादनापैकी दहा टक्के द्राक्षांची युरोप, अमेरिकेत निर्यात केली जाते. दरवर्षी डिसेंबर ते एप्रिल या मोसमात साधारणत: दोन लाख मेट्रिक टन द्राक्षे या दोन्ही खंडांत निर्यात होतात. द्राक्षांचे कंटेनर जहाजांद्वारे लाल समुद्रामार्गे युरोप, अमेरिकेत पोहोचतात.
मात्र, काही दिवसांपूर्वी आखाती देशांत सुरू असलेल्या युद्धाचा भाग म्हणून लाल समुद्रात हुती बंडखोरांनी जहाजांवर हल्ले केले. त्यानंतर जहाज कंपन्यांनी या मार्गाने होणारी मालवाहतूकच बंद केली. त्यामुळे आता आफ्रिकामार्गे द्राक्षनिर्यात करावी लागत आहे.
लाल समुद्रामार्गे द्राक्षे अठरा ते वीस दिवसांत युरोपात पोहोचत असत. एका कंटेनरसाठी सतराशे ते अठराशे डॉलर भाडे लागत असे. मात्र, आता आफ्रिकामार्गे यासाठी पस्तीस दिवस लागत असून, एका कंटेनरचे भाडे तब्बल सहा हजार डॉलर्सवर पोहोचले आहे.
म्हणजे एका कंटेनरमधील बारा टन द्राक्षांमागे तब्बल तीन लाख २० हजार रुपये वाढले आहेत. परिणामी, हा खर्च वसूल होण्यासाठी निर्यातदारांकडून द्राक्ष उत्पादकांना कमी भाव दिला जात आहे.
द्राक्ष उत्पादकांना ९० ते ९५ रुपये प्रतिकिलो भाव मिळणे अपेक्षित असताना, त्यांच्या हाती अवघे ६५ ते ७० रुपये पडत आहेत. त्यामुळे सध्याच्या अडचणीच्या काळात कंटेनर भाड्यासाठी अनुदान देण्याची मागणी द्राक्ष बागायतदार संघाकडून केंद्र व राज्य शासनाकडे केली जात आहे.
नियमांच्या नावाखाली अडवणूक?
एकीकडे द्राक्षनिर्यातीत अडथळे येत असताना व खर्चात मोठी वाढ झाली असताना, नाशिकरोडच्या अॅगमार्क कार्यालयात शासकीय नियमांच्या पूर्ततेच्या नावाखाली निर्यातदारांची अडवणूक केली जात असल्याच्या तक्रारी आहेत.
कार्यालयातील अधिकाऱ्यांकडून होत असलेल्या पिळवणुकीमुळे निर्यातदार माल उपलब्ध असूनही निर्यात करण्यास कचरत आहेत. त्यामुळे निर्यातीत घट झाल्याचा दावा केला जात आहे.