मुंबई – जानेवारी महिन्यात देशातील प्रमुख शहरात शाकाहारी थाळीच्या दरात पाच टक्क्यांनी वाढ झाली आहे. याच कालावधीमध्ये गेल्या वर्षाच्या जानेवारी महिन्याच्या तुलनेत मांसाहारी थाळीच्या दरात मात्र 13 टक्क्यांची घट झाल्याची आकडेवारी समोर आली आहे.
ही आकडेवारी क्रिसील या संस्थेचा एक विभाग संकलित करून जाहीर करतो.
जानेवारी महिन्यात डाळी, तांदूळ, कांदा, टोमॅटो इत्यादीच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे शाकाहारी थाळीचा खर्च वाढला आहे असे सांगण्यात आले. मात्र याच कालावधीमध्ये पोल्ट्री उत्पादनाच्या किमती कमी झाल्या आहेत. त्यामुळे मांसाहारी थाळीचे दर कमी झाले आहेत.
वार्षिक पातळीवर कांद्याच्या किमती 35 टक्क्यांनी वाढल्या आहेत. तर टोमॅटोच्या किमती 20 टक्क्यांनी वाढल्या आहेत. तांदळाच्या किमती या कालावधीत 12 टक्क्यांनी वाढल्या आहेत. तर डाळींच्या किमती नऊ टक्क्यांनी वाढल्या आहेत. पोल्ट्री उत्पादनाच्या किमती मात्र 26 टक्क्क्यांनी कमी झाल्या आहेत.
त्यामुळे मांसाहारी थाळीची किंमत कमी झाली आहे. एकूण महागाईच्या आकडेवारीत धान्याच्या किमतीचा वाटा जास्त आहे. यामुळे केंद्र सरकारने महागाई कमी करण्यासाठी बर्याच उपाय योजना केल्या आहेत. अनेक अन्न घटकाच्या निर्यातीवर बंदी घालण्यात आली आहे. त्याचबरोबर देशांतर्गत खरेदी वाढविण्यात आली आहे. असे असताना भारत ब्रँड या नावाखाली केंद्र सरकार डाळी आणि तांदूळ उपलब्ध करण्याचा प्रयत्न करत आहे.