मुंबई : राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत रोज झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात जवळपास 7 ते 8 हजारांहून अधिक रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे काही जिल्ह्यात लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. मात्र तरीही रुग्णसंख्या आटोक्यात येत नसल्याने सरकारकडून संपूर्ण महाराष्ट्रात लॉकडाऊन लावण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ठाणे शहरात अनलॉकनंतर सर्वकाही आलबेल झाले असतानाच कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा वाढण्यास सुरुवात झाली. सध्या ठाण्यात कोरोनाग्रस्तांचे प्रमाण चांगलेच वाढले आहे.अशाच प्रमाणात रुग्णांचा संसर्ग वाढत गेला तर आगामी काळात कोरोनावर नियंत्रण मिळवणे शक्य होणार नाही. त्यामुळे खबरदारी म्हणून ठाणे महापालिका क्षेत्रात 16 ठिकाणं कोरोना हॉटस्पॉट (प्रतिबंधित क्षेत्र ) निश्चित केली आहेत. त्यामुळे आता कोरोनाला अटकाव करण्यासाठी या 16 हॉटस्पॉटमध्ये येत्या 31 मार्चपर्यंत पुन्हा लॉकडाऊन असेल. अशी माहिती ठाण्याचे महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी दिली.
राज्यात गेल्या दोन दिवसात 20 हजारांच्या आसपास रुग्ण आढळले आहेत. राज्यात 8 हजार 744 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर 22 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात 97 हजार 638 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तसेच राज्यातील मृत्यूदर हा 2.36 टक्क्यांवर पोहोचला आहे. तर रविवारी 7 मार्चला 11 हजार 141 कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 38 जणांचा मृत्यू झाला होता.तर कोरोनाचे हॉट्स्पॉट ठरलेल्या मुंबईत पुन्हा एकदा रुग्णसंख्येत वाढ होत आहे. काल मुंबईत 1 हजार 014 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर चार जणांचा मृत्यू झाला होता. तर रविवारी मार्चला 1 हजार 360 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.
मुंबईत सध्या 9 हजार 373 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तीन आठवड्यापूर्वी मुंबईत दरदिवशी 500 पेक्षा कमी रुग्ण आढळत होते. त्यानंतर मात्र अचानक कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे मुंबई पुन्हा एकदा कोरोनाचे हॉटस्पॉट ठरते का? अशी भीती आता सर्वांना वाटू लागली आहे.