मुंबई : बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेत आल्यानंतर राज्यातील जनतेला मोफत लस पुरवणार असल्याचे आश्वासन दिले होते. पंतप्रधानांच्या याच वक्तव्याचा विरोधकांकडून समाचार घेण्यात येत आहे. दरम्यान, बिहारमध्ये निवडणुकांसाठी कोरोनाच्या लसीचे राजकारण करण्यात येत आहे परंतु, महाराष्ट्रात कोणतेही राजकारण न करता जनतेला कोरोनाची मोफत लस देण्यात येणार असल्याची ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांनी दिली आहे.
कोरोना लस भाजप लोकांचे जीव वाचवण्यासाठी देत आहे की निवडणुका जिंकण्यासाठी देत आहे, असा सवाल नवाब मलिक यांनी विचारला आहे. ते औरंगाबादमध्ये बोलत होते. भारतीय जनता पार्टी निवडणूक हरली तरी या देशातल्या लोकांना लस मोफतच मिळणार आहे आणि महाराष्ट्रातील जनतेला ही लस पूर्ण मोफत दिली जाईल, असं स्पष्टच नवाब मलिक यांनी सांगितलं.
बिहार विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात भाजपने मतदारांना कोरोनाची मोफत लस देण्याचे आश्वासन दिल्यानंतर आता राजकारण तापले आहे. भाजपच्या जाहीरनाम्यात सत्ता आल्यास बिहारमधील प्रत्येक व्यक्तीला कोरोनाची मोफत लस देऊ, असे आश्वासन देण्यात आले आहे. भाजपकडून गुरुवारी बिहार विधानसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला.
बिहारमधील प्रत्येक व्यक्तीला कोरोनाची लस मोफत देणे, हे आमचे प्रमुख आश्वासन असल्याचे यावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर प्रियंका चतुर्वेदी यांनी भाजपवर टीकेची तोफ डागली होती. कोरोनाची लस अजून आली नाही तरीही भाजपकडून त्याचा निवडणूक प्रचारासाठी वापर केला जात आहे. कोरोनाच्या लसीच्या वाटपासंदर्भात केंद्र सरकारने सर्व राज्यांना समान वागणूक द्यायला नको का, असा सवाल प्रियंका चतुर्वेदी यांनी भाजपला विचारला होता.