नवी दिल्ली – देशात करोना संसर्गाने एका दिवसात 4 हजार 454 बाधित दगावले. त्यामुळे देशातील करोनाबळींची एकूण संख्या 3 लाखांवर पोहचली आहे. अर्थात, नव्या बाधितांमध्ये सातत्याने होणारी घट दिलासादायी ठरत आहे.
देशात आतापर्यंत 3 लाख 3 हजार 720 करोनाबाधितांचा मृत्यू झाला. त्यामध्ये महाराष्ट्रातील सर्वांधिक 88 हजार 620 बाधितांचा समावेश आहे. त्याखालोखाल कर्नाटकात 25 हजार 282, दिल्लीत 23 हजार 202, तामीळनाडूत 20 हजार 468 मृतांची नोंद झाली. उत्तरप्रदेशात 19 हजार 209 तर पश्चिम बंगाल, पंजाब आणि छत्तिसगढ या राज्यांत 12 हजारांपेक्षा अधिक बाधित मृत्युमुखी पडले.
देशात एका दिवसात 2 लाख 22 हजार 315 नवे करोनाबाधित आढळले. ती संख्या 38 दिवसांतील सर्वांत कमी ठरली आहे. देशातील सक्रिय बाधितांची संख्या घटून 27 लाख 20 हजार 716 इतकी झाली आहे. ते प्रमाण एकूण बाधितांच्या 10.17 टक्के आहे. बाधित बरे होण्याचे प्रमाण वाढून 88.69 टक्के इतके झाले आहे.