मुंबई – माजी कर्णधार, समालोचक व माजी कसोटीपटू रवी शास्त्री हे भारतीय संघाचे सर्वात यशस्वी प्रशिक्षक ठरले आहेत. संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदावर नियुक्ती करण्यात आल्यापासून संघाने 174 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्यात संघाने 114 सामन्यांमध्ये विजय मिळविला. शास्त्रींच्या कारकिर्दीत भारताची यशाची टक्केवारी जवळपास 65 टक्के आहे.
शास्त्री यांच्या प्रशिक्षणाखाली भारतीय संघाने 38 पैकी 23 कसोटी सामने जिंकले आहेत. त्याचबरोबर एकदिवसीय सामन्यांत 76 पैकी 51 सामन्यांत विजय मिळवला. टी-20 मध्ये भारताने 60 पैकी 40 सामने जिंकले आहेत.
कसोटी क्रिकेटमध्ये 20 किंवा त्यापेक्षा जास्त सामन्यांत संघाचे प्रशिक्षक म्हणून काम करताना शास्त्रीच सर्वात यशस्वी ठरले आहेत. 2017 साली अनिल कुंबळे यांनी प्रशिक्षकपदाचा पदभार सोडला होता, तेव्हा राहुल द्रविड यालाच या जागी नियुक्त करा, अशी मागणी होत होती.
मात्र, त्यावेळी खुद्द द्रविड यानेच असमर्थता दर्शवली होती. त्यावेळी ही जबाबदारी शास्त्रींकडे सोपवण्यात आली. त्यानंतर द्रविडला राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा (एनसीए) संचालक बनवण्यात आले.