Air Pollution – दिल्ली (Delhi), पंजाब (Punjab) आणि हरियाणा (Haryana) या तीन राज्यातील हवा प्रदूषणाच्या (Air Pollution) समस्येवरून तिन्ही राज्यांतील सरकारांमध्ये वादंग निर्माण झाले आहे. या प्रकरणी हरियाणा राज्याने दिल्ली आणि पंजाब या दोन राज्यांवर ठपका ठेवला आहे.
हरियाणाने नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशनने या संबंधात काही प्रतिमा प्रकाशित केल्या आहेत त्यात हरियाणाच्या तुलनेत पंजाबमध्ये जास्त राब जाळताना दिसत आहे. 25 आणि 26 ऑक्टोबर रोजी हरियाणाच्या तुलनेत पंजाबमध्ये दुप्पट राब जाळण्याच्या घटना घडल्याचा दावा हरियाणा सरकारने केला आहे.
हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांचे ओएसडी जवाहर यादव यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाब सरकारवर राब जाळण्याच्या मुद्द्यावरून निशाणा साधला आहे. या आधी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी या बाबत हरियाणाला जबाबदार धरले होते.
पंजाब सरकारने शुक्रवारी हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी राज्य सरकारने उचललेली पावले प्रसारीत केली. पंजाब सरकारने राबवलेल्या उपायांमुळे शेतातील राब जाळण्याच्या समस्येवर बऱ्यापैकी मात करणे शक्य झाले आहे असे त्या राज्याच्या सरकारने म्हटले आहे.
दिल्लीचे मंत्री सौरभ भारद्वाज म्हणाले की, संपूर्ण उत्तर भारतात प्रदूषण वाढण्यासाठी दिल्लीला जबाबदार धरणे हे क्षुद्र राजकारण आहे. ते म्हणाले की, दिल्लीचे क्षेत्रफळ पाहिल्यास, दिल्ली इतकी लहान आहे की ती भारताच्या नकाशावरही दिसत नाही.
दिल्लीमुळे उत्तर भारतात प्रदूषण होत आहे, असे समजणे म्हणजे क्षुद्र राजकारण आहे. केंद्र सरकारला काम करावे लागेल. राज्यांनी चांगल्या आणि दीर्घकालीन योजना कराव्यात. केवळ प्रदूषण आल्यावर इतरांना दोष देऊन फायदा होणार नाही.
हरियाना सरकारने केलेल्या आरोपाच्या संबंधात बोलताना भारद्वाज म्हणाले. दिल्लीला दोष देण्याऐवजी केंद्र सरकारने राज्यांसोबत बसून उत्तर भारतातील प्रदूषण रोखण्यासाठी दीर्घकालीन योजना आखण्याची गरज आहे. एकमेकांवरील आरोपांतून ही प्रदुषणाची समस्या संपणार नाही असे त्यांनी म्हटले आहे.