Chandrapun Lok Sabha Election 2024 – चंद्रपुरात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा पार पडली. सभेत पीएम मोदी यांच्या आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषण केले. यावेळी त्यांनी काॅंग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. काँग्रेसने जाहीरनामा प्रसिद्धीकरण केला आहे. मात्र, जाहीरनामा प्रसिद्ध करण्याचा त्यांना अधिकार नाही. भारताला खड्ड्यात घातल्याबद्दल त्यांनी माफीनामा प्रसिद्ध करायला हवा होता, काँग्रेसकडे पन्नास वर्षांचा हिशोब मागितला पाहिजे, अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री शिंदे यांनी केली. चंद्रपूर शहराजवळ मोरवा विमानतळाच्या बाजूला विस्तीर्ण 16 एकर परिसरात ही प्रचार सभा पार पडली.
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील विदर्भातील महायुतीचे चंद्रपूरचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार, गडचिरोलीचे उमेदवार अशोक नेते यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चंद्रपूरात सभा पार पडली. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांसह महायुतीच्या नेत्यांची उपस्थिती होती. या सभेसाठी मोठ्या प्रमाणात नागरिक जमा झाले होते. महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात 19 एप्रिलला विदर्भातील गडचिरोली, भंडारा-गोंदिया, नागपूर, चंद्रपूर, रामटेक या लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या चंद्रपुरातील भाषणातील मोठे मुद्दे –
– बाळासाहेब ठाकरे यांचे राम मंदिराचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्ण केले.
– महाराष्ट्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचाराचा पहिला नारळ हा चंद्रपूर मध्ये फुटत आहे. हा केवळ योगायोग नाही, तर हे येथील विजयाची नांदी आहे.
– आज इथे जमलेली गर्दी पाहता आपण गुढीपाडवा साजरा करतोय की, काय असे वाटत आहे. अशाच प्रकारचा जल्लोष आपल्याला चार जून रोजी निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर करायचा आहे. विक्रमी मतांनी विजय मुनगंटीवार हे विजयी होतील. सुधीर मुनगंटीवार हे विजयाची गुढी नक्कीच उभारतील.
– देशाच्या जनतेने पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्याचा संकल्प केला आहे. दहशतवादी हल्ले, भ्रष्टाचार, घोटाळे, बॉम्बस्फोट, दंगली या सर्वांना यूपीए सरकारच्या कार्यकाळात त्रासलेल्या जनतेला गेल्या दहा वर्षात मोदींच्या कारकीर्दीमध्ये देश विकासाच्या वाटेने पुढे जात असल्याचे दिसत आहे. काँग्रेस पक्षाच्या पन्नास वर्षांच्या कार्यात जेवढी कामे झाली नाही तेवढी कामे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दहा वर्षांच्या कार्यकाळात झाली आहेत.
– पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या देशाला मजबूत केले आहे. आपल्या देशाला महासत्तेकडे घेऊन जाण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. समान नागरी कायदा नको आहे, असे म्हणणाऱ्या विरोधकांना मात्र समलिंगी संबंध हवे आहेत. अशा प्रकारचे लोक आपल्यासमोर उभे आहेत. ‘आपकी बार 45 पार’ हा महाराष्ट्राचा संकल्प आहे.