विरोधकांची महाआघाडी विखुरल्याचे अधोरेखित
पाटणा – बिहारमध्ये कॉंग्रेसशी निवडणूक समझोता करण्यास माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांच्या नेतृत्वाखालील राजदने नकार दर्शवला आहे. त्यामुळे त्या राज्यातील विरोधकांची महाआघाडी विखुरल्याच्या बाबीवर शिक्कामोर्तब झाले आहे.
बिहार विधान परिषदेतील 24 जागा रिक्त आहेत. त्या जागा भरण्यासाठी मार्च किंवा एप्रिलमध्ये निवडणूक अपेक्षित आहे. त्यामुळे राजकीय गोटातील हालचाली वाढल्या आहेत. अशात विरोधकांच्या महाआघाडीचे नेतृत्व करणाऱ्या राजदने काही दिवसांपूर्वी 21 उमेदवारांची नावे जाहीर केली. त्यामुळे उर्वरित 3 जागांसाठी तो पक्ष कॉंग्रेसशी समझोता करू शकतो, असे चित्र पुढे आले.
मात्र, राजदने आणखी 2 उमेदवार जाहीर केले. त्याशिवाय, 1 जागा डाव्या पक्षांसाठी सोडली. त्यामुळे राजदने विधान परिषद निवडणुकीसाठी कॉंग्रेससाठी दरवाजे बंद केल्याचे स्पष्ट झाले. बिहारमध्ये कॉंग्रेसशी निवडणूक समझोता करण्याचा काही उपयोग नाही. मात्र, केंद्रीय पातळीवर आम्ही कॉंग्रेसला पाठिंबा देऊ, अशी भूमिका राजदने घेतली आहे. त्या भूमिकेसाठी 2020 मधील बिहार विधानसभा निवडणूक कारणीभूत ठरली आहे.
त्या निवडणुकीत राजद, कॉंग्रेस आणि डाव्या पक्षांनी एकत्र येत महाआघाडी स्थापन केली. त्या निवडणुकीत राजद सर्वांत मोठा पक्ष ठरला. मात्र, कॉंग्रेस पक्ष अपेक्षित कामगिरी करू न शकल्याने महाआघाडीला बिहारच्या सत्तेने हुलकावणी दिली. तेव्हापासून बिहारमधील निवडणुकीत कॉंग्रेसशी हातमिळवणी राजकीयदृष्ट्या लाभदायी नसल्याची भावना राजदमध्ये रूजली आहे. त्यातून आगामी विधान परिषद निवडणुकीसाठी राजद आणि कॉंग्रेसमध्ये फाटाफूट झाली आहे. आता कॉंग्रेस काय भूमिका घेणार याविषयी उत्सुकता आहे.