पुणे-मानव विकास कार्यक्रमअंतर्गत इयत्ता आठवी ते बारावीपर्यंत शिक्षण घेत असलेल्या व शाळा, महाविद्यालयापासून पाच कि.मी. अंतरापर्यंत राहणाऱ्या गरजू मुलींना सायकल खरेदीसाठी अनुदानात वाढ केली आहे. पूर्वी 3 हजार 500 रुपये अनुदान मिळायचे ते आता वाढ होऊन पाच हजार रुपये मिळणार आहे.
राज्यातील 23 जिल्ह्यांतील 125 अतिमागास तालुक्यांत मानव विकास कार्यक्रम राबविण्यात येतो. गरजू मुलींना दिल्या जाणाऱ्या सायकलींच्या किंमती गेल्या काही वर्षांत सातत्याने वाढत असल्याने व चांगल्या दर्जाची सायकल घेण्याकरिता शासनाकडून उपलब्ध करून देण्यात येणार साडेतीन हजार रुपये अनुदान पुरेसे होत नाही. त्यामुळे सायकल खरेदीसाठी प्रति मुलींना लाभार्थी म्हणून अनुदानात वाढ करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यास मान्यता देण्यात आली आहे. याबाबतचे आदेशही नियोजन विभागाचे कक्ष अधिकारी वनिता जाधव यांनी दिले.
पहिल्या टप्प्यात गरजू मुलींच्या राष्ट्रीयकृत बॅंक खात्यात डी.बी.टी.द्वारे 3 हजार 500 रुपये आगाऊ रक्कम जमा करण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यात लाभार्थी मुलींना सायकल खरेदी केल्यानंतर सायकल खरेदीची पावती व इतर कागदपत्रे सादर केल्यानंतर त्यांना उर्वरित 1 हजार 500 रुपये एवढे अनुदान थेट अदा करण्यात येणार आहे.