सचिन पायलट यांचे प्रतिपादन
जयपुर : अयोध्येत भव्य राम मंदिर व्हावे ही कॉंग्रेसचीही इच्छा आहे असे कॉंग्रेस नेते व राजस्तानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी म्हटले आहे. या प्रकरणात आता सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला आहे. तो सर्वांनाची मान्य करावा आणि यावरील राजकारण आता पुर्णपणे थांबवावे अशी सुचनाही त्यांनी केली आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे कॉंग्रेसने स्वागत केले असून तेथे मंदिर भव्य मंदिर उभारणी व्हावी अशी आमचीही इच्छा आहे. या विषयावरील राजकारण थांबणे हे अधिक महत्वाचे आहे. जग पुढे चालले आहे आणि आपण तेच ते विषय लाऊन अडून बसलो आहोत असे होता कामा नये असेही त्यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.
राजस्थान आणि अन्य राज्यात झालेल्या स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांमधून लोकांचा आता बदललेला मूड दिसून आला आहे असेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी राजस्तानातील नगरपालिका व महापालिका निवडणुकीसाठी मोठे कष्ट घेतले त्यामुळे आमचे दोन हजार नगरसेवक निवडून आले आहेत. कॉंग्रेसला 49 पैकी 20 नगरपालिकांमध्ये स्पष्ट बहुमत मिळाले असल्याचेही त्यांनी सांगितले.