पिंपरखेड भागातील बाधितांची विचारपूस
जांबुत – बेट भागातील पिंपरखेड परिसरात ढगफुटीसदृश झालेल्या पावसाने नुकसान झालेल्या बाधित शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, अशी मागणी भीमाशंकर साखर कारखान्याचे संचालक ऍड. प्रदीप वळसे पाटील यांनी केली.
पिंपरखेड (ता. शिरूर) येथे (दि.29) झालेल्या ढगफुटीसदृश पावसाने नुकसान झालेल्या भागाची पाहणी भीमाशंकर कारखान्याचे संचालक वळसे पाटील यांनी केली. त्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांची भेट घेत विचारपूस केली. यावेळी शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून तातडीने मदतीचे अहवाल तयार करावेत, अशा सुचना प्रांताधिकारी व तहसिलदार यांना दिल्या.
माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या सूचनेवरून पिंपरखेड येथील नुकसानग्रस्त भागाची पाहणी वळसे यांच्याकडून करण्यात आली. या पावसामुळे शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळले असून टोमॅटो, कोबी, फ्लॉवर, सोयाबीन, झेंडू, भुईमूग आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेतीचे बांध व रस्ते वाहून गेले आहेत. लवकरच हे बांध व रस्ते दुरूस्त करून देऊ यासाठी भीमाशंकर कारखान्याच्या माध्यमातून जेसीबी व ट्रॅक्टर उपलब्ध करून दिला जाईल. स्थानिक ग्रामस्थ व ग्रामपंचायत प्रशासनाने सहकार्य करावे.प्रांताधिकारी व तहसिलदारांनी यासाठी मुरूम उपलब्ध करून द्यावा, अशा सूचना वळसे यांनी यावेळी दिल्या.
दिवसेंदिवस ओढ्या-नाल्यांची रूंदी कमी कमी होत असल्याचे दिसून येत असल्याने अशा प्रकारची आपत्ती उभी राहिल्यास पाणी वाहून जात नाही. प्रसंगी हे सर्व पाणी शेतकऱ्यांच्या घरात, कांदाचाळीत, शेतात आणि रस्त्यांवरून वाहून गेल्याने मोठ्या प्रमाणात नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांनी प्लॅस्टिक वस्तू, पत्रावळीचा वापर टाळणे गरजेचे असून शेतात अथवा ओढ्यात न टाकता योग्य विल्हेवाट लावावी, अशा सूचना ग्रामस्थांना दिल्या.
यावेळी पिंपरखेडचे सरपंच राजेंद्र दाभाडे, भागडी गावचे माजी सरपंच पोपटशेठ थिटे, वैभव उंडे, काठापूरचे सरपंच बिपीन थिटे, उपसरपंच विकास वरे, माजी उपसरपंच दामोदर दाभाडे, रामदास ढोमे, नरेश ढोमे, किशोर दाभाडे, शरद बोंबे, देवराम ढोमे, निवृत्ती बोंबे, नानाभाऊ गावशेते, चेअरमन किरण ढोमे, दीपक बोऱ्हाडे, दत्ता वरे, विश्वास वरे, बाबाजी बराटे, ग्रामस्थ उपस्थित होते.
माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आज पिंपरखेड दौऱ्यावर
माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील सोमवार (दि.1) सकाळी दहा वाजता पिंपरखेड दौऱ्यावर येणार आहेत. ढगफुढीसदृश पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करणार असल्याची माहिती सरपंच राजेंद्र दाभाडे यांनी दिली. तर ज्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले असून पंचनामे झालेले नाहीत. त्या सर्व शेतकऱ्यांनी उपस्थित यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन माजी उपसरपंच नरेश ढोमे व युवा नेते शरद बोंबे यांनी केले आहे.