पुणे – लष्कर भागात पीएमपी बसच्या धडकेत मृत्यूमुखी पडलेल्या मोटारचालकाच्या कुटुंबीयांना अडीच कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश मोटार अपघात न्यायाधिकरणाचे सदस्य सत्र न्यायाधीश एस. बी. हेडाऊ यांनी दिले. मोटारचालक धीरेन शिवप्रसाद तिवारी हे ९ जून २०१८ रोजी लष्कर भागातील पूलगेट परिसरातून निघाले होते. त्यावेळी पीएमपी बसने त्यांच्या मोटारीला धडक दिली.
अपघातात तिवारी यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. तिवारी यांच्या पाच वारसांनी बसचालक, पीएमपी प्रशासन, विमा कंपनीविरुद्ध अॅड. संजय गायकवाड, अॅड. अस्लम पीरजादे, अॅड. प्रसाद शिवरकर, अॅड. सबीना शेख यांच्यामार्फत दावा दाखल केला होता. मोटार अपघात न्यायधिकरणात दाव्यावर सुनावणी झाली. अपघात पीएमपी बसचालकाच्या निष्काळजीपणामुळे झाल्याचे निरीक्षक न्यायाधीश एस. बी. हेडाऊ यांनी नोंदविले
अपघातात मृत्युमुखी पडलेले धीरेन तिवारी यांचे वय, त्यांच उत्पन्न आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबीय या बाबी विचारात घेऊन न्यायधिकरणाने अडीच कोटी रुपयांचे नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले. दावा दाखल केलेल्या तारखेपासून वार्षिक सात टक्के व्याजदराने नुकसान भरपाईची रक्कम मृताच्या कुटुंबीयांना देण्यात यावी, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.