दशरथ फुले यांचे निवडणूक आयोगाकडे मागणी
फलटण – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका गेले दोन वर्षांपासून न घेतल्यामुळे प्रशासकांची एकाधिकारशाही वाढली असून त्यामुळे सर्व सामान्य जनतेच्या मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्वरीत घेण्यात घ्याव्यात अन्यथा अन्यथा आम्हास जनआंदोलन उभारावे लागेल, अशी मागणी राज्य निवडणूक आयोगाकडे सामाजिक कार्यकर्ते दशरथ फुले यांनी केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, राज्यातील जवळपास सर्वच स्थानिक स्वराज संस्थांचा प्रश्न रखडले आहेत. शिंदे, फडणवीस सरकारच्या तसेच त्यापूर्वीच्या सरकारच्या धोरणामुळे ओबीसी आरक्षण तसेच प्रभाग रचना या मुद्यावर न्यायालयात अडकून पडला असल्याने गेली दोन वर्षापासून प्रशासकीय राजवट आहे. त्यामुळे जनतेला आपल्या अनेक सामाजिक प्रश्नांना समोरे जावे लागत आहे. अशा प्रकारची वेळ यापुर्वी स्वातंत्र्यापासून राज्यात कधीही निर्माण झालेली नव्हती.
प्रशासकीय राजवटीमुळे या संस्थानमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार वाढला असून एकाधिकारशाही तसेच मनमानी कारभार वाढला आहे. सर्वसामान्य नागरिकास मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. नगरपालिका वार्ड परिसरातील प्रश्न नागरिक नगरसेवकांच्या माध्यमातून सोडवून घेत असतात तसेच पंचायत समिती सदस्य, जि. प. सदस्य, आपले भागातील आरोग्य, रस्ते, वीज, पाणी, शैक्षणिक, सामाजिक प्रश्न प्रशासनाच्या माध्यमातून सोडवून घेतात. परंतू गेली दोन वर्षापासून प्रशासक असल्याने सर्वसामान्य नागरिकांना कोणीही वाली राहिला नाही.त्यामुळे लोकशाहीला काळीमा फासल्याची परिस्थिती आज राज्यात निर्माण झाली आहे.
गेली दोन वर्षापासून प्रशासक आहे. परंतू यावर गांभीर्याने कोणीही बोलण्यास तयार नाही. त्यामुळे प्रशासकीय कारभार पहाणार्यांनाही रान मोकळे झाले आहे. शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थाची योग्य ती माहिती न्यायालयात सादर करून निवडणूका लावण्याची विनंती करावी. अन्यथा जनतेच्या रोषास सामोरे जावे लागणार आहे. निवेदनाच्या प्रती केंद्रीय निवडून आयोग, राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना पाठविल्या आहेत.