केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांना पत्र
पुणे – राज्य सरकारने बार्टी, सारथी आणि महाज्योतीच्या माध्यमातून पीएच.डी. करणाऱ्या संशोधक विद्यार्थ्यांना अटी शिथिल करून सरसकट शिष्यवृत्ती देण्याची गरज आहे, असे पत्र केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांना दिले आहे.
राज्यातील संशोधक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यासाठी येत्या १० जानेवारीला चाळणी परीक्षा घेतली जाणार आहे. मात्र, परीक्षा न घेता सरसकट शिष्यवृत्ती देण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांकडून आंदोलन केले जात आहे. या मागणीच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांकडून गडकरी यांना निवेदन देण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर गडकरी यांनी पाटील यांना पत्र दिले आहे.
बार्टी, सारथी, महाज्योतीसारख्या माध्यमातून पीएच.डी. करणाऱ्या संशोधक विद्यार्थ्यांना राज्य सरकारकडून मदत मिळत नसल्याचे विद्यार्थ्यांनी दिलेल्या नमूद केले आहे. या विद्यार्थ्यांना राज्य सरकारद्वारे सरसकट शिष्यवृत्ती देणे गरजेचे आहे. मात्र, पीएच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळत नसल्याचे दिसून येत आहे.
पीएच.डी. करणारे संशोधक विद्यार्थी पदवीधर झाल्यानंतर आणि दोन वर्षे पदव्युत्तर पदवी झाल्यावर पीएच.डी. करण्यासाठी किमान ५५ टक्के गुण असण्याची अट आहे. या अटीची पूर्तता झाल्यावरही प्रवेश मिळणे सोपे नाही. त्यासाठी अनेक परीक्षा देणे गरजेचे आहे. तसेच पीएच.डी.साठी मार्गदर्शक मिळणेही कठीण काम आहे.
त्यासाठी बार्टी, सारथी, महाज्योतीच्या माध्यमातून पीएच.डी. करणाऱ्या संशोधक विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारने अटी शिथिल करून शिष्यवृत्ती देण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे राज्यात पीएच.डी. धारकांची संख्या वाढण्यास मदत होणार आहे. या बाबत तातडीने धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज आहे. आपल्या स्तरावर योग्य तो निर्णय घ्यावा आणि पीएचडी करणाऱ्या संशोधक विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा, असे गडकरी यांच्या पत्रात नमूद केले आहे.