संदीप राक्षे
सातारा – जिल्ह्यात सर्वात मोठा असलेला वाई-खंडाळा-महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघ आपल्या ताब्यात घेण्यासाठी भाजपने जंग जंग पछाडायला सुरुवात केली आहे. आ. मकरंद पाटील यांच्या या सुभेदारीवर डोळा ठेवून त्यांची राजकीय रसद तोडण्याचे काम खंडाळा तालुक्यातून सुरू झाले आहे.
आधी विजयसिंह मोहिते-पाटील आणि नंतर मदन भोसले यांनी राष्ट्रवादीच्या नाराजांची मोट बांधण्याची गणिते मांडायला सुरुवात केली आहे. युतीच्या वाटपातील शिवसेनेच्या हिश्श्याचा हा मतदारसंघ काबीज करण्याचे भाजपचे मनसुबे समोर आल्याने मतदारसंघातील कट्टर शिवसैनिकांची चलबिचल वाढली आहे.
वाई तालुक्यातील कट्टर शिलेदारांवर आ. मकरंद पाटील यांची भिस्त असून यंदाच्या निवडणुकीत त्यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. वाई मतदारसंघ हा जिल्ह्यातील सर्वात मोठा मतदारसंघ असून कोकण हद्दीपासून पुणे जिल्ह्याच्या सीमेला हा मतदारसंघ भिडला आहे. तब्बल तीन लाख 61 हजार मतदार असलेल्या या मतदारसंघात पंचायत समिती, बाजार समिती व जिल्हा परिषदेचे नऊपैकी आठ सदस्य राष्ट्रवादीचे असल्याने हा राष्ट्रवादीचा अभेद्य गड मानला जातो. मकरंद पाटील यंदा आमदारकीची हॅट्ट्रीक नोंदवण्याच्या तयारीत आहेत. मात्र, भाजपमध्ये गेलेले
माजी आमदार मदन भोसले यांनी सुरू केलेली तयारी हा स्वबळाच्या चाचपणीचा भाग आहे. राजकीय परिस्थिती बघून शिवबंधन बांधलेल्या पुरुषोत्तम जाधव यांनीसुद्धा आपल्या उमेदवारीची घोषणा केली आहे.
दोन्ही कॉंग्रेसची आघाडी झाली नाही तर विराज शिंदे हेसुद्धा विधानसभेच्या आखाड्यात उतरण्याची चिन्हे आहेत. युतीचे संदर्भ वगळल्यास वाईत चौरंगी लढतीची शक्यता असून अर्थातच मकरंदआबांचा यंदाच्या निवडणुकीत कस लागणार आहे.
आ. मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने यश मिळवले असले तरी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत महाबळेश्वरमध्ये शिवसेनेने दिलेला धक्का आणि खंडाळ्यात निर्भेळ यशाला अपक्षांनी लावलेला “ब्रेक’ यांचा विचार मकरंद पाटील यांना नक्कीच करावा लागेल. यशवंतनगर, बावधन, ओझर्डे व भुईंज हे चारही गट आणि पंचायत समितीचे आठपैकी सहा गण राष्ट्रवादीच्या ताब्यात आहेत. तिन्ही तालुक्यांमध्ये सत्तेची बेरीज राष्ट्रवादीच्या बाजूची असली तरी मदन भोसले यांच्या भाजप प्रवेशाने तालुक्यातील कॉंग्रेस दुबळी झाली आहे.
आबांचे “डॅमेज कंट्रोल’ काय असेल?
महाबळेश्वर तालुक्यातील अंर्तगत गटबाजी विरोधकांना मदतीची ठरली आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत तळदेव गटातून शिवसेना पुरस्कृत प्रणिता जंगम विजयी झाल्या होत्या. कुंभरोशी गणातही शिवसेनेने बाजी मारली होती. राजेंद्र राजपुरे यांच्यामुळे भिलार गटासह महाबळेश्वर पंचायत समिती राखल्याने राष्ट्रवादी तेथे तरली. विरोधकांचा हा वाढता प्रभाव रोखण्याचे आव्हान मकरंदआबांपुढे आहे.
“मदनबाण’ घायाळ करणार?
2014 च्या विधानसभा निवडणुकीत मकरंद पाटील 38,702 च्या मताधिक्क्याने विजयी झाले होते. त्यांना 46 टक्के मते मिळाली होती. मात्र, पाच वर्षांत पुलाखालून बरेच पाणी गेले. भाजपवासी झालेल्या मदन भोसले यांनी गेल्या सात महिन्यात कोट्यवधी रुपयांचा निधी आणला. भाजपचा हा “मदनबाण’ मकरंदआबांना घायाळ करू शकतो. मदन भोसले यांनी वाई व महाबळेश्वर तालुक्यातील अनेक राजकीय कार्यकर्त्यांचा भाजप प्रवेश घडवून मकरंदआबांना धक्का दिल्याचे मानले जात आहे.
युतीअंतर्गत संघर्षाची चिन्हे
भाजपच्या विजय संकल्प बूथ मेळाव्यात चंद्रकांत पाटील यांनी मदन भोसले यांची उमेदवारी जाहीर केली. युतीत हा मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. शिवसेनेच्या पुरुषोत्तम जाधव यांनी स्वत:ची उमेदवारी जाहीर केल्याने युतीत अंर्तगत संघर्ष वाढण्याची चिन्हे आहेत. खंडाळ्याचे ज्येष्ठ नेते बकाजीराव पाटील व नितीन भरगुडे-पाटील हे राष्ट्रवादीचे नाराज मोहरे भाजपच्या गळाला लागण्याची चिन्ह आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीचे केडर खंडाळा तालुक्यात बॅकफूटवर गेले आहे.