नाणे मावळ,(वार्ताहर) – येथील गावाला स्मशानभूमी नसल्याने गावातील मृत नागरिकांचे अंत्यसंस्कार उघड्यावर करावे लागतात. ऊन असो वा पाऊस ग्रामस्थांना तसेच पाहुणे- मंडळींना त्याचा त्रास सहन करावा लागतो. यासाठी ग्रामस्थांनी व संबंधित प्रशासनाने या विषयावर वेळीच विचार करणे गरजेचे आहे.
नाणे मावळातील नाणोली गावातील ग्रामस्थ स्मशानभूमीविषयी कसलाही विचार करत नसल्याने स्मशानभूमीचा प्रश्न प्रलंबित आहे. स्मशानभूमीच्या अभावामुळे पावसाळ्यात अंत्यविधी करताना अडचण निर्माण होते. रात्रीच्या वेळी भर काळोखात पावसापासून सरणाचे संरक्षण करण्यासाठी याठिकाणी ग्रामस्थांना लोखंडी पत्रे चारही दिशांना पकडून धरावे लागतात. काही वेळा तर पावसाच्या पाण्यामुळे मृताचे शरीर अपूर्णवस्थेत जळालेले राहते. त्यामुळे याठिकाणी स्मशानभूमीचे बांधकाम होणे महत्वाचे व गरजेचे आहे.
जागेच्या प्रश्नामुळे स्मशानभूमीचा अभाव
याठिकाणी अंत्यविधी करत असेलेले ठिकाण हे इंद्रायणी नदीपात्राशेजारी खासगी क्षेत्र आहे. दुसरे ठिकाण हे नदीपात्राच्या क्षेत्रात मोडते. नदीपात्रातील जागेचे संमतीपत्र नसले तरी ती अनेक वर्षांची वहीवाट असल्याने स्मशानभूमी शेड लोकवर्गणीतुन होऊ शकते यावर ग्रामस्थांनी विचार करणे महत्वाचे आहे.
स्मशानभूमीच्या रस्त्याचीही मोठी समस्या
पावसाळ्यात नाणोली गावातून स्मशानभूमीपर्यंत अंत्ययात्रा नेणे तसेच गणपती विसर्जन करण्यासाठी जाणे म्हणजे जिकरीचे ठरते. कच्चा रस्ता आणि मोठया प्रमाणात चिखल अशी अवस्था याठिकाणची असते. पावसाळ्यात अंत्यविधीसाठी आलेल्या पाहुण्यांना या रस्त्यामुळे मोठा त्रास होतो. गावात जर स्मशानभूमीचा रस्ता झाला तर ग्रामस्थांची व पाहुणेमंडळींची चिखलातील पायपीट व त्रास होणाऱ्या रस्त्यामुळे दूर होईल.
काही वर्षांपूर्वी स्मशानभूमी मंजूर झाली होती. पण, जागेच्या प्रश्नामुळे त्याठिकाणी काम करता आले नाही. सध्या गावाने विचार केला तर लोकसहभागातून त्याठिकाणी स्मशानभूमीचे काम करता येऊ शकत.
– सोपान काटकर, सरपंच, साई ग्रुपग्रामपंचायत
स्मशानभूमीची कामे आमदार किंवा खासदार यांच्या शिफारशीनुसार ग्रामीण विकास निधी, डोंगरी विकास निधी आणि 25-15 अंतर्गत मंजूर होतात. मंजूर झाल्यानंतर ती कामे आम्ही करतो आणि त्यानंतर स्मशानभूमी सांभाळायची जबाबदारी ग्रामपंचायतची असते.
जिल्हा परिषद अंतर्गतही स्मशाभूमीची कामे केली जातात. नाणोली गावाला जागेचा प्रश्न आहे. त्याठिकाणी सरकारी किंवा ग्रामपंचायतच्या मालकीची जागा नाही त्यामुळं तिथं स्मशानभूमी मंजूर होत नाही.
खाजगी जागा असेल तर जागामालक ग्रामपंचायतला बक्षीसपत्र देऊन त्या जागेचे ग्रामपंचायत दप्तरी नोंद करून मग पुढे आमदार साहेबांकडे मागणी करून स्मशानभूमीचे काम मंजूर करून, बांधकामही करता येऊ शकतं – नंदकुमार खोत, उपशाखा अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, मावळ