नवी दिल्ली – गरीब मुलांच्या शैक्षणिक विकासासाठी दिल्ली सरकारतर्फे त्यांना मोफत टॅब देण्याची योजना आखण्यात आली होती. मात्र शालेय विद्यार्थ्यांना टॅब वाटपासाठी तयार करण्यात आलेल्या पहिल्या मसुद्याचे टेंडर 20 टक्के जास्त देण्याच्या लालसेने दुसऱ्या कंपनीला देण्यात अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांचा सहभाग होता, असा आरोप सुकेश चंद्रशेखरने केल्याने खळबळ माजली आहे. केजरीवाल यांनी वेगवेगळ्या करारांतून एक हजार कोटी रुपयांचे कमिशन घेतल्याचा आरोप सुकेशने केला आहे.
आधीच मद्यावरील अबकारी कराच्या घोटाळ्यामुळे दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया सीबीआय चौकशीच्या फेऱ्यात अडकलेले असताना सुकेशच्या नव्या आरोपाने आम आदमी पक्षाची उरलीसुरली विश्वासार्हताही पणाला लागली असल्याचे मानले जात आहे. फसवणुकीच्या गुन्ह्यात मंडोली कारागृहात बंद असलेल्या सुकेश चंद्रशेखरने दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवर स्टेशनरी घोटाळ्याचा आरोप करणारे पत्र लिहिले आहे. सुकेशने आपल्या वकिलामार्फत माध्यमांना पाठवलेल्या पत्रात केजरीवाल सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.
Maharashtra : राज्यात Cough Syrup बनवणाऱ्या 6 कंपन्यांचे परवाने रद्द
सुकेश म्हणाला की, या टॅबलेट्स चायनीज कंपनीकडून त्यांच्यामार्फत विकत घेतल्या जात होत्या. मात्र दुसऱ्या कंपनीने 20 टक्के जास्त कमिशन देण्याचे आमिष दाखवले, त्यामुळे केजरीवाल सरकारने मला टेंडर न देता दुसऱ्याला देण्याचा निर्णय घेतला होता. केजरीवाल मला ठग म्हणतात, पण तेच सर्वात मोठे घोटाळेबाज आहेत.
सुकेश याने लिहिले आहे की, अरविंद केजरीवाल आणि सत्येंद्र जैन यांनी त्याला पक्षासाठी निधी गोळा करण्यास सांगितले होते. त्याने दावा केला की, केजरीवाल आणि तुरुंगात असलेल्या सत्येंद्र जैन यांनी सहा वर्षांपूर्वी त्यांच्या वाढदिवसाला “शोले’ चित्रपटातील प्रसिद्ध गाणे ‘ये दोस्ती नहीं तोडेंगे’ समर्पित केले होते. तसेच त्यांना मध्यपूर्वेतील देश आणि दक्षिण भारतातून निधी उभारण्यास सांगितले होते.