Arvind Kejriwal Arrest: दिल्ली उच्च न्यायालयाने (Delhi High Court) मंगळवारी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (CM Arvind Kejriwal) यांची अबकारी धोरण प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ED) केलेल्या अटकेला आव्हान देणारी याचिका फेटाळून लावली. त्यामुळे त्यांना दिलासा मिळू शकला नाही. केजरीवाल यांची अटक कायद्याचे उल्लंघन करणारी नाही. आणि त्यांना देण्यात आलेल्या रिमांडला “बेकायदेशीर” म्हणता येणार नाही असा अभिप्रायही कोर्टाने नोंदवला आहे.
न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा (Justice Swarna Kanta Sharma) यांच्या खंडपीठाने सांगितले की, ईडीकडे पुरेसे साहित्य होते ज्यामुळे त्यांनी केजरीवाल यांना अटक केली. केजरीवाल यांनी तपासात सहभागी न होणे हे त्यांच्यासाठी हानीकारक ठरले आहे.
अंमलबजावणी संचालनालयाने गोळा केलेल्या सामग्रीवरून असे दिसून आले आहे की अरविंद केजरीवाल यांनी कट रचला आणि गुन्ह्यातील रक्कम वापरण्यात आणि लपवण्यात सक्रिय सहभाग घेतला. ते त्यांच्या वैयक्तिक अधिकारात तसेच आम आदमी पक्षाचे संयोजक म्हणूनही त्यात गुंतले होते असे प्राथमिक स्वरूपात दिसून येत आहे असेही न्यायालयाने म्हटले आहे.
न्यायालयाने पुढे म्हटले की, आरोपीला अटक करण्यात आली आहे आणि त्याची अटक आणि रिमांड हे निवडणुकीच्या वेळेनुसार नव्हे तर कायद्यानुसार तपासले जाणे आवश्यक आहे. सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी अटक करण्याच्या वेळेला केजरीवाल यांनी दिलेले आव्हान ईडीच्या बाजूने कोणताही दोष नसतानाही टिकणार नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. केजरीवाल यांना २१ मार्च रोजी अंमलबजावणी संचालनालयाने अबकारी धोरण प्रकरणात अटक केली आहे. अबकारी धोरणाच्या निर्मितीमध्ये केजरीवाल यांचा थेट सहभाग असल्याचा दावाही एजन्सीने केला आहे.
15 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडीत तिहार तुरुंगात –
दरम्यान, ईडीने 21 मार्चला अरविंद केजरीवाल यांना अटक केली होती. 22 मार्च रोजी केजरीवाल यांना राऊस एव्हेन्यू कोर्टात हजर केले होते. न्यायालयाने दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना 28 मार्चपर्यंत ईडी कोठडीत पाठवले होते, जी नंतर 1 एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली. 1 एप्रिल रोजी न्यायालयाने त्यांना 15 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडीत तिहार तुरुंगात पाठवले. गेल्या 9 दिवसांपासून ते तिहार तुरुंगात बंद आहेत.
मद्य धोरण प्रकरणी केजरीवाल यांना 9 समन्स पाठवले होते –
मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल यांना अटक करण्यापूर्वी ईडीने 9 समन्स पाठवले होते. यावर्षी 17 मार्च, 27 फेब्रुवारी, 26 फेब्रुवारी, 22 फेब्रुवारी, 2 फेब्रुवारी, 17 जानेवारी, 3 जानेवारी आणि 2023 मध्ये 21 डिसेंबर आणि 2 नोव्हेंबरला समन्स पाठवण्यात आले होते.
मात्र, ते एकदाही चौकशीसाठी गेले नाही. यानंतर 21 मार्च रोजी ईडीची टीम 10व्या समन्स आणि सर्च वॉरंटसह केजरीवाल यांच्या घरी पोहोचली. केजरीवाल हे अटक झालेले पहिले विद्यमान मुख्यमंत्री आहेत. यापूर्वी झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ईडीने अटक केली होती. सोरेन यांनी राजभवनात जाऊन ईडीच्या कोठडीतून राजीनामा दिला होता.