औरंगाबाद – औरंगाबाद शहराचे नामांतरण झाले असून छत्रपती संभाजीनगर असे नवीन नाव ठेवण्यात आले आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या संमतीने हा निर्णय गेल्या आठवड्यात घेण्यात आला; मात्र आता या नामांतराला विरोध होत असून औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनेकजण आंदोलन करत आहेत.
इम्तीयाज जलील हे देखील या आंदोलनात सहभागी झाले असून येथे आता औरंगाबाद हेच नाव राहू देण्यासाठी साखळी उपोषणाला सुरुवात झाली आहे. यावेळी अनेकांच्या हातात ‘आय लव्ह औरंगाबाद’चे फलक दिसत आहेत. यावेळी खासदार इम्तियाज जलील यांनी आंदोलन स्थळी भेट दिली आहे.
जलील म्हणाले की, “उपोषणाची सुरुवात झाली असून, पाहा आणखी किती दिवस सुरु असणार आहे. उपोषणासाठी आलेले सर्वजण सर्वसामान्य औरंगाबादकर आहेत. तर औरंगाबादचे नाव हे औरंगाबादच ठेवायला पाहिजे अशी, त्यांची भावना आहे. आता आम्ही कोणत्याही प्रकारे राजकारण करत नाही. हे माझे शहर असून, त्यासोबत आमच्या भावना जोडल्या गेल्या आहेत. आम्हाला सरकारला सांगायचे आहे की, आमच्या शहराचे नाव दिल्ली आणि मुंबईत बसून बदलू शकत नाही. देशात लोकशाही आहे तुमची हुकुमशाही चालणार नाही. त्यामुळे आम्हाला नामांतराचा निर्णय मान्य नाही.”
दरम्यान, उपोषणस्थळी पोलीसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. वरिष्ठ अधिकारीही उपोषणाच्या ठिकाणी उपस्थित आहेत. हे साखळी उपोषण कधीपर्यंत संपेल याबाबत कोणतीही माहिती अद्याप नाही. यावेळी आंदोलन कर्त्यांनी आपल्या अंगात ‘आय लव्ह औरंगाबाद’चे टी शर्टही घातले होते. तसेच हातात या नावाचे फलकही दिसत आहेत. यावेळी शेकडो नागरिकांनी उपोषणास्थळी हजेरी लावली. शहराचे नाव पुन्हा औरंगाबादच कायम ठेवण्याची मागणी उपोषणकर्ते करत आहेत.