उरूळी कांचनमधील नागरिकांची मागणी ः वाहतूक कोंडी वाढली
सोरतापवाडी – उरूळी कांचन येथील महामार्गावरील अनधिकृत पार्किंग बंद करा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. एलाईट चौक ते तळवाडी चौकापर्यंत अनेक बॅंका, ऑफिस, दुकाने आहेत. त्यांना पार्किंगची सोय नसल्याने ग्राहक रस्त्यावर गाडी लावून आपले काम करण्यात मग्न असतात. त्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. उरूळी कांचन येथील चौकात तर स्थानिक लोक रस्त्यावर गाडी लावून बिनधास्त फिरत असतात.
वाहतुकीचा पार खेळखंडोबा झाला असून तळवाडी चौकात तर चारही बाजूने स्वतःचे वाहन पुढे नेण्यासाठी जणू स्पर्धाच चालू असते. त्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. रुग्णवाहिकेला सुद्धा या चौकातून लवकर रस्ता मोकळा मिळत नाही. त्यात भर म्हणजे उरूळी कांचन गावात जाण्याऱ्या दोन्ही रस्त्यांवर अतिक्रमण झाले. ग्रामपंचायतीने ते अतिक्रमण काढून महामार्गापासून शंभर ते दीडशे फुटांपर्यंत रस्ता मोकळा ठेवावा.
त्यामुळे महामार्गावरील वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका होईल. दरम्यान, याबाबत लोणी काळभोर पोलीस ठाण्याशी संपर्क साधला असता पोलिसांची संख्या कमी असून सर्वत्र वाहतूक पोलीस ठेवता येणार नसल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, वाहतूक प्रश्न सोडवण्यासाठी स्थानिक पोलीस प्रशासन हतबल झाले आहे.