दिल्ली विधानसभेचे बहुप्रतिक्षित निकाल आज जाहीर झाले. आम आदमी पक्षाचा झाडू जोरदार चालला. शब्दश: विरोधकांची त्यांनी झाडून साफसफाई केली. आम आदमी पक्षाचा हा विजय अनेक अर्थांनी लक्षणीय आहे. भारतीय जनता पक्षाने तेथे सर्व ताकद पणाला लावली होती. असे म्हणतात की, दिल्लीच्या 70 मतदारसंघात भाजपचे 240 खासदार, 30 आजी-माजी मुख्यमंत्री, अन्य राज्यांतील भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि तब्बल 40 केंद्रीय मंत्री पक्षाच्या प्रचारासाठी दारोदारी हिंडत होते. सरकारी यंत्रणेचा सर्रास दुरूपयोग सुरू होता आणि साथीला मजबूत धनशक्तीही होती. या साऱ्या माऱ्यापुढे मध्यमवर्गीय घरांतील मुलांना घेऊन लढणाऱ्या केजरीवालांचा काय निभाव लागणार, असा प्रश्न अनेकांच्या मनात होता. पण केजरीवाल तेथे एखाद्या योद्ध्यासारखे लढले. अगदी चक्रव्यूहात शिरून लढणाऱ्या अभिमन्यूची आठवण यावी, अशी त्यांची झुंज होती.
लोकांनीही मनापासून साथ दिली आणि दिल्लीत पुन्हा एकदा चमत्कार घडला आहे. या निकालासाठी दिल्लीकर जनताही अभिनंदनाला पात्र आहे. त्यांनी कसल्याही प्रभावाखाली न येता चांगले प्रशासन देणाऱ्याच्या बाजूने आपला निर्विवाद कौल दिला आहे. या निकालाचा देशाच्या पुढील राजकारणावर निश्चितच वेगळा परिणाम होणार आहे. दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत भाजपने आपली सर्व अस्त्रे वापरली. त्यात कलम 370 रद्द करणे, ट्रिपल तलाक रद्द करणे, सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईक, पाकिस्तान, शाहीनबाग, हिंदू-मुस्लीम अशा सर्व अस्त्रांचा समावेश होता. ही सगळीच्या सगळी अस्त्रे मतदारांनी नाकाम ठरवली.
भावनिक मुद्दे किंवा बेगडी राष्ट्रवाद हा निवडणुका जिंकण्यासाठी प्रभावी ठरत नाही, हे लोकसभेनंतर भाजपला लागोपाठ चौथ्यांदा निदर्शनाला आले आहे. ते त्यातून किती बोध घेतील हा भाग वेगळा; पण या आधी हरियाणात वरील सर्व मुद्द्यांचा वापर करूनही तेथे भाजप बहुमत गमावून बसली. तेथे त्यांनी दुसऱ्या पक्षाला मदतीला घेऊन सरकार स्थापन केले, हा भाग वेगळा पण महाराष्ट्रात तर ते भाग्यही त्यांच्या वाट्याला आले नाही. त्यांना महाराष्ट्रातही अपेक्षित यश मिळाले नाही; आणि नंतर तर त्यांना येथे सत्ताही गमवावी लागली. झारखंडमध्ये तर हा पक्ष चक्क पराभूत झाला आणि आता दिल्लीत त्यांना केजरीवालांनी धूळ चाटायला लावली. भारतीय जनता पक्षाला आता आपल्या निवडणूक स्ट्रॅटेजीचाच फेरविचार करायला लागेल, असा स्पष्ट संदेश दिल्लीच्या निकालाने दिला आहे.
दिल्लीत केजरीवालांनी चांगले काम केले आहे, हे जनतेने आता निर्विवादपणे मान्य केले आहे. त्यांच्या चांगल्या कामाच्या विरोधात भारतीय जनता पक्षाने शाहीनबागेच्या मुद्द्याचा वापर करून त्यांना नाकाम करण्याचा प्रयत्न केला. पण शाहीनबागेच्या मुद्द्याच्या ट्रॅपमध्ये केजरीवाल अडकले नाहीत. हा राजकीय चाणाक्षपणा त्यांनी दाखवला त्याबद्दल त्यांचे कौतुकच करावे लागेल. वास्तविक शाहीनबागेत जे लोक भाजप सरकारच्या विरोधात धरणे धरून बसली आहेत, त्यांच्याशी आम आदमी पक्षाचा काहीएक संबंध नसताना अमित शहांसह सर्व नेते आम आदमी पक्षाला त्याबद्दल दोषी ठरवू पाहात होते. हा नाठाळपणा होता. वारंवार तो विषय उपस्थित करून केजरीवालांना त्यावर काही तरी संतप्त प्रतिक्रिया द्यायला भाग पाडले जात होते. पण भाजपचा कावा केजरीवालांनी ओळखला आणि संपूर्ण निवडणूक प्रचारात त्यांनी थंड डोक्याने भाजपची सारी रणनीती हाणून पाडली. एकुणातच, आम आदमी पक्ष हा देशाच्या राजकारणातील एक वेगळा प्रयोग आहे. ही जी मुले त्या पक्षात काम करीत आहेत, त्यांच्यापैकी कोणालाही राजकीय पार्श्वभूमी नाही, त्यांच्यापैकी कोणाचाही बाप, आजी माजी आमदार किंवा खासदार नाही.
सिस्टीम बदलाच्या विरोधात नुसती चर्चा करण्यापेक्षा प्रत्यक्ष मैदानात उतरून सिस्टीम बदलली पाहिजे, या ध्येयाने प्रेरित झालेल्या कार्यकर्त्यांचा हा पक्ष आहे. राजकारणातील बारकावे, चाली त्यांना कळत नसतीलही; पण उदात्त ध्येयाचा एक वेगळा राजकीय प्रयोग त्यांनी घडवला आहे. दिल्लीत केजरीवालांना केंद्र सरकारकडून कमी त्रास सोसावा लागला आहे काय? त्यांच्या प्रत्येक निर्णयाला आडकाठी आणली गेली. खुद्द मुख्यमंत्र्यांच्याच घरावर आणि कार्यालयावर सीबीआयचे छापे घातले गेले. त्यांच्या अनेक आमदारांना क्षुल्लक कारणांवरून अटक केली गेली, त्यांच्यावर नियंत्रण आणण्यासाठी अनिल बैजल यांच्यासारख्यांना दिल्लीत लेफ्टनंट गव्हर्नर पदावर बसवून केजरीवालांना जाम करण्याचा सर्वंकष प्रयत्न झाला. पण त्या सगळ्या आव्हानाला हा पक्ष आणि त्याचे नेतृत्व पुरून उरले आहे. आम आदमी पक्षाच्या राजकारणाची फिलॉसॉफीही लक्षात घेतली पाहिजे.
आज देशाच्या मुख्य प्रवाहातील सर्वच पक्ष कोणत्या ना कोणत्या “ईझम’मध्ये अडकलेले आहेत. भाजप हिंदू ईझममध्ये, कॉंग्रेसवाले सेक्युलॅरिझममध्ये बाकीचे पक्ष सोशॅलिझम, कम्युनिझम अशा ईझममध्ये अडकले आहेत. या “ईझम’मध्ये अडकलेल्या राजकीय सिस्टीममुळेच देशाच्या राजकारणाचे वाटोळे झाले आहे, अशी केजरीवालांची धारणा आहे. त्यामुळे त्यातून बाहेर पडून कोणत्याही ईझमची कास न धरता, जे जे चांगले आहे ते ते स्वीकारून, खऱ्या अर्थाने लोकांच्या भल्यासाठी प्रशासकीय सिस्टीम चालवली पाहिजे, अशी त्या पक्षाची धारणा आहे. राजकारणातील हा नवीन प्रयोग आहे. तो टिकला पाहिजे. त्याचा नीट अभ्यास केला पाहिजे, लोकांचीही त्याला का साथ मिळू लागली आहे, यावरही चिंतन व्हायला पाहिजे. हे चिंतन अन्य कोणापेक्षा भाजपने अधिक केले पाहिजे. जेमतेम आठ-दहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत दिल्लीतील सातही जागा जिंकणाऱ्या भारतीय जनता पक्षाला इतक्या कमी कालावधीत लोकांनी का अव्हेरले यावर त्यांना विचार करावाच लागेल.
भावनिक राजकारण करण्यापेक्षा आता खऱ्या अर्थाने विकासाचे राजकारण केले पाहिजे, हा धडा त्यांना या निवडणुकीने दिला आहे. आज जे दिल्लीत झाले त्याचीच पुनरावृत्ती उद्या सर्वत्र होऊ शकते. त्यामुळे हा पराभव म्हणजे भाजपसाठी धोक्याची घंटा आहे. केजरीवालांना वेड्यात काढून किंवा दिल्लीकर जनतेला फुकटे संबोधून भाजपच्या पदरात काही पडणार नाही. मोदी-शहा या जोडगोळीसाठी दिल्लीकर जनतेने दिलेला हा “वेकअप कॉल’ आहे. विधानसभा निवडणुकीतील या लक्षणीय यशाबद्दल केजरीवालांचे अभिनंदन करावेच लागेल.