कात्रज (धीरेंद्र गायकवाड) -पुणे शहराचे दक्षिणेकडील प्रवेशद्वार असलेल्या कात्रज चौकात शुक्रवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास अभूतपूर्व वाहतूक कोंडी झाली. चुकीच्या पद्धतीने वळण घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या पीएमपी बसेसमुळे यात भर पडली. इतके सर्व होऊनही वाहतूक पोलीस कोठेच दिसले नाहीत. कामकाजासाठी जाण्याच्या वेळेत दररोज ही समस्या उद्भवत असताना सामान्य नागरिक वैतागले आहेत. पण, कैफियत मांडायची कोठे? असा संतप्त सवाल ते विचारत आहेत.
सगळेच जबाबदार
कात्रज चौकातील वाहतूक कोंडीची समस्या वर्षानुवर्षे कायम आहे. याकडे महापालिका पथ विभाग व अतिक्रमण नियंत्रण प्रशासन, वाहतूक पोलीस प्रशासन, पीएमपी विभागाचे दुर्लक्ष झाल्याने चौकाची ही अवस्था झाल्याचे स्थानिक नागरिक सांगत आहेत. पीएमपी बस, अनधिकृतपणे थांबवलेल्या रिक्षा-जीप, थांबा नसतानाही थांबवण्यात येणाऱ्या एसटी बसेस, अनधिकृत टपऱ्या व खाद्यपदार्थांचे स्टॉल आणि त्यासमोर पार्किंग यामुळे दिवसेंदिवस चौकाचा श्वास अधिक गुदमरत आहे.
चौक ओलांडण्यास अर्धा तास
वाहतूक कोंडी समस्या कायमस्वरूपी कात्रजच्या माथी असणार का, असा प्रश्न स्थानिक नागरिक विचारत आहे. अनधिकृत वाहतूक करणाऱ्यांचे ग्रहण, रिक्षा स्टॅंड असल्याने या चौकातून जाणे म्हणजे अर्धा तासाचा अवधी लागत आहे. चौकात चाललेले उड्डाणपुलाचे काम, पीएमपीची तीन स्थानके यामुळे देखील वाहतूक कोंडीची वाढत आहे. उड्डाणपुलाच्या कामामुळे बॅरिकेट्स उभारण्यात आले. पण, त्यातून वाहतुकीला वळण मिळण्यापेक्षा कोंडी वाढत आहे.
पीएमपीकडून नियमांचे उल्लंघन
कात्रज चौकातील तीन थांब्यांवर दररोज शेकडो पीएमपी बसेस फेऱ्या मारतात. मात्र चौकात उजवीकडे वळण्यास मनाई असूनही चालक सर्रासपणे बस वळवतात. परिणामी बस वळवताना अन्य वाहने अडकून पडतात. येथील स्टॅंडवरील रिक्षांची संख्या 50-60 वर गेलेली आहे. त्यात अन्य वाहनांची भर असते.
गरज “मिशन कात्रज क्लीन’ची
2019 मध्ये भारती विद्यापीठ वाहतूक पोलीस नियंत्रण कक्ष येथे वरिष्ठ निरीक्षक राजेश पुराणिक यांनी “मिशन कात्रज क्लीन’ राबवत कात्रज चौकातील अनेक वाहनेतसेच पीएमपी बसेसवरही कारवाई केली होती. त्यांनी केलेले प्रयत्न त्यावेळी विशेष गाजले होते. मात्र, त्यानंतर अजूनही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी हवे असे प्रयत्न झालेले नाही.
शुक्रवारी सकाळी पीएमपी बसेस लागोपाठ आल्या. तसेच उंड्रीकडून वाहतूक वाढल्याने चौकामध्ये वाहतूक कोंडी झाली होती. ती सोडवण्यात आली. अनधिकृत रिक्षा व वाहनांवर कारवाई सुरू असून दररोज अशा वाहनांवर कारवाई करत आहोत. वाहतूक कोंडीत पीएमपी बसमुळे अडचण येत आहे. त्याबाबत त्यांच्याशी चर्चा करून योग्य ते मार्ग काढण्यात येईल
– प्रशांत कणसे, सहायक पोलीस निरीक्षक (वाहतूक), भारती विद्यापीठ पोलीस
ज्या बस कात्रज चौकात उजव्या बाजूला वळत आहेत, त्यांच्यावर कारवाई सुरू आहे. हे प्रमाण कमी झालेले असून त्यावर अजून उपाययोजना करत आहोत. शुक्रवारी सकाळी कोंडी सोडवण्यासाठी पीएमपी कर्मचारीही सरसावले होते.
– गोविंद हांडे, आगार व्यवस्थापक, पीएमपीएमएल, कात्रज