नवी दिल्ली : महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष सुरू आहे. दोन्ही पक्ष आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी राज्यपाल भगतसिंग कोशियरी यांची स्वतंत्रपणे भेट घेतली. शिवसेना कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यासमवेत सरकार बनवण्याचा प्रयत्न करीत असल्याचे वृत्त समोर येत आहे. यासर्व घडामोडीत आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत भाजप अध्यक्ष आणि गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे. या भेटीत काय घडले हे अद्याप समोर आले नाही.
Delhi: Chief Minister of Maharashtra Devendra Fadnavis met Union Home Minister Amit Shah. https://t.co/Z3LWzhNFqK pic.twitter.com/3iK3HuA4oF
— ANI (@ANI) November 4, 2019
सत्तास्थापनेवरुन अनेक तर्कवितर्कांना उधाण आले असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची दिल्ली दरबारी भेट घेतली. राज्यातील ओला दुष्काळ आणि राजकीय परिस्थिती यादृष्टिने ही भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे. अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना केंद्राकडून लवकरात लवकर मदत मिळावी, यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी अमित शहा यांची भेट घेतली असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, यावेळी राजकीय मुद्यावरही चर्चा होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, भाजप-शिवसेना यांच्यातील तणावाच्या वातावरणानंतरही आम्ही स्थिर सरकार देऊ, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. दुसरीकडे सरकार स्थापनेबाबत सर्व गोष्टी लवकरच जनतेसमोर येतील, अशा भाषेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला इशारा दिला आहे.
उल्लेखनिय आहे की, यासर्व घडामोडीत शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांना जय महाराष्ट्र असा मेसेज पाठवून भाजपवर दबाव वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. यासर्व पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांच्यात काय चर्चा झाली हे पाहणे आता उत्सूकतेचे आहे.