नवी दिल्ली : केंद्र सरकारने ऑगस्ट महिन्यात जम्मू-काश्मीरला देण्यात आलेला विशेष राज्याचा दर्जा रद्द केल्यानंतर देशासह जगभरात याविषयी अनेक चर्चांना उधाण आले आहे. या प्रकरणावरून तर पाकिस्तानच्या दहशतवादी कारवाया काही केल्या कमी होताना दिसत नाही. त्यातच आता देशातही याच मुद्यावरून चर्चा सुरू झाल्या आहेत. जम्मू-काश्मिरला विशेष राज्याचा दर्जा देणाऱ्या कलम 370 मध्ये आम्ही एक-दोन नव्हे तर तब्बल 12 वेळा बदल केले आणि हे कलम सौम्य केले. पण त्यावरून कोणताही वाद निर्माण झाला नाही. पण सध्याचे सत्ताधारी असलेले भाजपचे संपूर्ण राजकारणच कायम वादग्रस्त ठरले आहे, अशी टीका कॉंग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा यांनी केली आहे.
डेहराडूनमध्ये एका पत्रकार परिषदेत पवन खेरा म्हणाले, या आधी एक किंवा दोन नाही तर तब्बल 12 वेळा कॉंग्रेस पक्षाने कलम 370 मध्ये बदल केले. पण त्यावरून कोणताही वाद निर्माण होणार नाही, याची काळजी आम्ही घेतली होती. त्यामुळे त्यावेळी कोणताही वाद झाला नाही. देशाचा कारभार हा चर्चेतून वाटाघाटीतून करायचा असतो. प्रत्येकवेळी वाद उत्पन्न होईल, असे काम करायचे नसते, असेही त्यांनी सांगितले.
कलम 370 रद्द करण्यामागची भाजपची भावना गेल्या अनेक वर्षांपासून सगळ्यांना माहिती आहे. त्यामध्ये काहीही बदल झालेला नाही. पण ज्या पद्धतीने हे कलम रद्द करण्यात आले ती पद्धत चुकीची आहे, असे पवन खेरा यांनी म्हटले.
सध्या केंद्र सरकारकडून ज्या पद्धतीने वस्तू व सेवा कराची अंमलबजावणी केली जात आहे. ती सुद्धा चुकीचीच आहे. यामुळे छोटे व्यावसायिक, उत्पादक आणि शेतकरी देशोधडीला लागले आहेत, असा आरोप त्यांनी केला.