औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्याचे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे धाराशिव नामांतर करण्यात आले आहे. मात्र याच नामांतराच्या निर्णयाला छत्रपती संभाजीनगरमध्ये अजूनही मोठ्या प्रमाणात विरोध होताना दिसून येत आहे. या निर्णयाविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या सात दिवसांपासून साखळी उपोषण करण्यात येत आहे. तर दुसरीकडे आज शहर बंदची हाक देण्यात आली आहे. महाराष्ट्र मुस्लीम अवामी कमिटीतर्फे हा बंद पुकारण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
छत्रपती संभाजीनगर नामांतराविरोधात वेगवेगळे आंदोलन शहरात होत आहे. याच आंदोलनाचा भाग म्हणून आज औरंगाबाद शहर बंदची हाक देण्यात आली आहे. महाराष्ट्र मुस्लीम अवामी कमिटीतर्फे आज ‘शहर बंद’ची हाक देण्यात आली. तर औरंगाबाद आणि उस्मानाबाद या शहरांची नावे बदलल्याच्या निषेधार्थ लोकविकास परिषदेतर्फे आज भडकलगेट ते विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे. दुपारी तीन वाजता या मोर्चाला सुरुवात होणार आहे.
दरम्यान, औरंगाबाद नामांतरविरोधी कृती समितीच्या वतीने काल कँडल मार्च काढण्यात आला. संध्याकाळी 7 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय ते भडकल गेट येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत हा कँडल मार्च काढण्यात आला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे नाव औरंगाबादच ठेवावं या प्रमुख मागणीसाठी हजारो नागरिक रस्त्यावर पाहायला मिळाले. या कँडल मार्चचे नेतृत्व महिलांनी केले. यावेळी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील हे देखील उपस्थित होते.
औरंगाबाद शहराचे नाव छत्रपती संभाजी नगर करु नये म्हणून, आत्तापर्यंत पाच हजार पाचशे जणांनी आक्षेप घेतल्याचा दावा करण्यात आला आहे. साखळी उपोषण जिथे सुरु आहे तिथून आतापर्यंत 3 हजार 300 आक्षेप घेणारे अर्ज विभागीय आयुक्त कार्यालयात देण्यात आले. तर इतर लोकांनी मिळून आतापर्यंत विभागीय आयुक्त कार्यालयात 2300 नामकरण बाबतचे आक्षेप दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे आतापर्यंत विभागीय आयुक्त कार्यालयाकडे औरंगाबाद शहराचे नाव छत्रपती संभाजी नगर करु नये म्हणून 5500 जणांनी आक्षेप अर्ज दाखल केले आहेत.