Chhagan Bhujbal : राज्यात सध्या मराठा आरक्षणाच्या मुद्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना पक्षातील बंडाचा मुद्दा तापला आहे. विधानसभा अध्यक्षांसमोर शिवसेनेच्या आमदार अपात्रतेची सुनावणी चालू असताना निवडणूक आयोगासमोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर सुनावणी होत आहे. या पार्श्वभूमीवर कर्जतमध्ये अजित पवार गटाच्या शिबिरामध्ये मंत्री छगन भुजबळांनी थेट शरद पवारांवर निशाणा साधला आहे.
कर्जतमध्ये अजित पवार गटाच्या शिबिरामध्ये मंत्री छगन भुजबळांनी बोलताना,” १९९९ साली स्थापन झालेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपलाच असल्याचे म्हटले. तसेच “आपला पक्ष नवीन नाही, जुना आहे. १९९९ साली स्थापन झालेला पक्ष हाच आहे. याच पक्षाचा पहिला प्रांताध्यक्ष छगन भुजबळ होता”, असे भुजबळ म्हणाले.
पुढे भुजबळांनी नाव न घेता शरद पवार यांच्यावर निशाणा साधताना,“एवढी चिडचिड का चाललीये हे काही मला कळलं नाही. सगळेच इकडे आले तर आम्ही काय करायचं? तुमचंही तेच तर चाललं होतं. २००४ सालीही तुमचं तेच चाललं होतं. तेव्हापासून चालूच आहे ना? यातल्या काही गोष्टी प्रफुल्ल पटेलांना माहिती आहेत. मला फार थोड्या गोष्टी माहिती आहेत. पण जेव्हा माहिती झालं, तेव्हा वाटलं की तळ्यात-मळ्यात करण्याऐवजी एकदाचा काय तो निर्णय घ्या”, असे म्हणत टीका केली.
तसेच “५४ आमदार आणि खासदारांनीही भाजपाबरोबर सरकार स्थापनेसंदर्भातील कागदावर सह्या केल्या. सगळी मंडळी जात होती. जयंत पाटील, अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल विमानात तयार बसले होते. पण जयंत पाटलांना वाटलं की परत विचारायला जावं. पण मग साहेब म्हणाले थांबा, नका बसू विमानात. शिवाय हे एकदा झालेलं नाही. अनेकदा झालंय. तुम्ही एखाद्या पक्षाला एकदा हो म्हणून सांगितलं आणि नंतर तुम्ही मागे सरलात तर ते एकदा ठीक आहे. पण प्रत्येक वेळी तेच तेच घडतंय”, असा आरोपही त्यांनी शरद पवारांवर केला.
दरम्यान, राष्ट्रवादीतील बंडांच्या वेळीच प्रसंग भुजबळांनी यावेळी सांगितला. आपण भाजपाबरोबर गेल्यामुळे अडचण काय झाली? असा सवाल भुजबळांनी शरद पवारांना केला आहे. “आम्ही काय आमचा पक्ष सोडलाय का? आमचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आहे. अडचण काय आहे? म्हणे मार्ग बदलला. नितीश कुमार भाजपाबरोबर जाऊन आले. काय झालं? आहेत तिथेच आहेत. जयललिता, नवीन पटनायक, मेहबुबा मुफ्तीही गेल्या होत्या. मग त्यांची विचारधारा बदलली का? आम्हीही अजित पवारांच्या नेतृत्वाखाली भाजपाच्या सरकारमध्ये गेलो. त्याआधी आम्ही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेबरोबर सरकारमध्ये गेलो. म्हणजे आम्ही शिवसेनेचे झालो का? नाही. तसं म्हटलं तर शिवसेना आणि भाजपा विचारधारा सारखीच आहे. मग तिकडे गेलं तर चालतं आणि इकडे गेलं तर चालत नाही असं कसं?” असा प्रश्न भुजबळांनी उपस्थित केला आहे.
“आम्ही सगळे महाराष्ट्राच्या जनतेसाठी सरकारमध्ये गेलो आहोत. सत्ता काय, आम्ही अनेकदा मंत्री झालो आहोत. त्यात काय आहे? पण जनतेच अनेक प्रश्न आहेत. ते सोडवायला आम्ही गेलो. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत जनतेनं आपल्यासोबत असल्याचं स्पष्ट केलं आहे. न्यायालयीन लढाईही सुरू झाली आहे. तारीख पे तारीख चलता है. न्याय आपल्या बाजूनेच होईल”, असंही ते म्हणाले.