जगदिश देशमुख
मानवी जीवन अधिक सुसह्य व्हावे, प्रगत व्हावे, मानवी जीवनास हितकारक असे जास्तीत जास्त संशोधन, शोध हे पाश्चिमात्य देशातच का लागतात? जास्तीत जास्त पेटंटचे मालक तेच का असतात? असे काय पाश्चिमात्य देशात आहे जे भारतात आणि पूर्वेकडील देशात नाही. त्यात भारताचा बुद्धिगुणांक जगात सगळ्यात वरचा असतानाही भारत मागे का? भारतीयांची संशोधनाची पूर्वीची उज्ज्वल परंपरा पुन्हा भारताला प्राप्त होईल का?
अल्फाबेट कंपनीच्या कार्यकारी पदावरून पायउतार होण्याचा निर्णय गूगलचे जन्मदाते सर्जी ब्रिन व लॅरी पेज यांनी घेतला आणि त्यांची जबाबदारी सुंदर पिच्चाई यांच्याकडे दिली. 21 वर्षांपूर्वी म्हणजे 1998 साली सिलकॉन व्हॅलीत (कॅलिफोर्निया) एका गॅरेजमध्ये गूगलची सुरुवात झाली. त्यानंतर 2015 साली कंपनीत मोठे बदल झाले आणि अल्फाबेटला गूगलची मूळ कंपनी बनवण्यात आलं. आजच्या घडीला गूगल जगातील सर्वात मोठ्या कंपन्यांमधील एक गणली जाते. जगातील पहिल्या 5 कंपन्यांमध्ये ही कंपनी असताना असे कोणी कंपनी सोडणार का? आणि आपल्या कुटुंबातला नसताना दुसऱ्या कुणालातरी आपल्या इतक्या मोठा कंपनीचा उत्तरदायी बनवणार का? यशाला चिकटून राहायचे नाही, वंशजाला उत्तरदायी बनवायचा नाही हे त्यांचे विचार. भारतात हे शक्य आहे का? जमीन वाटपावरून भावा-भावांमध्ये समजूतदारपणा नाही.
सर्जी ब्रिन व लॅरी पेज या दोघांचे वय 46 वर्षे आहे. गूगलमधून निवृत्ती का घेतली आहे तर त्यांना जगासाठी आणखी भव्यदिव्य असे काहीतरी करायचे आहे. ते भव्यदिव्य म्हणजे काय तर त्यांना वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून विमानांप्रमाणे आकाशात उडणाऱ्या गाड्या बनवायच्या आहेत. यासाठी त्यांनी अनेक कल्पक अभियंत्यांना सोबत घेतले आहे. त्यांनी हा नवीन प्रोजेक्ट हातामध्ये घेतलाय असा प्रोजेक्ट ज्यात यश येण्याचे प्रमाण फारच कमी आहे. पण यश आले तर जगाचा चेहरा बदलून जाईल. आपल्या देशात वयाच्या 46व्या वर्षी एखाद्या कंपनीचे मालक त्यांच्यासारखा धाडसी निर्णय घेतील का. हे सगळे पाश्चिमात्य देशात का घडते त्याचे उत्तर हे तेथील सामाजिक, धार्मिक आणि राजकीय व्यवस्थेमध्ये आहे. आपल्या देशातही धाडसी लोक आहेत पण त्यांना पूरक अशी सामाजिक, धार्मिक, राजकीय व्यवस्था नाहीये.
ह्याच व्यवस्थांचा परामर्श घेऊ या- धार्मिक व्यवस्था- पाश्चिमात्य देशात कर्मयोगाला महत्त्व आहे, आपल्याकडे कर्मकांडाला अनेकजण महत्त्व देतात. पाश्चिमात्य देशातील धर्मव्यवस्थेमध्ये पुनर्जन्म ही संकल्पनाच नाहीये, जे काय करायचे ते ह्या एकाच जन्मात करायचे आहे. जे काय शोध लावायचे आहेत, कष्ट करायचे आहेत, जे काही मिळवायचे आहे, ते याच जन्मात. त्यामुळे पाश्चिमात्य देशातील लोक 70-80 वर्षांच्या आपल्या आयुष्यामध्ये स्वतःला झोकून देऊन काम करतात. पाश्चिमात्य मिळालेल्या जन्माला संधी मानतात. हा मूलभूत फरक दोन्ही समाजाच्या मानसिकतेत सापडतो.
सामाजिक व्यवस्था- पाश्चिमात्य समाजव्यवस्थेमध्ये एक संकल्पना स्पष्ट आहे की आयुष्यामध्ये आपण ह्या पृथ्वीसाठी उपयुक्त ठरेल असे काहीतरी करून जाऊ या. जगावेगळे काहीतरी करणाऱ्याला तिकडे प्रोत्साहित केले जाते. लागेल ती मदत केली जाते. वेगळी वाट स्वीकारणाऱ्याला समाजात सन्मान आहे. समाजव्यवस्थेत जास्त बंधने नाहीत. जितकी जास्त बंधने तितकी व्यक्ती बंडखोर होते अशी त्यांची धारणा आहे. कुटुंबाची जबाबदारी डोक्यावर राहत नाही. त्यामुळे ते लोक जास्तीत जास्त वेळ हा आवडीच्या कामात घालवतात. तिथल्या समाजव्यवस्थेमध्ये व्यक्तीपेक्षा संस्थेला अधिक महत्त्व आहे. उलट भारतीय समाजव्यवस्था ही व्यक्तीसापेक्ष आहे. जे काही करायचे ते कुटुंबासाठी, त्याच्यापेक्षा वेगळं काही करायला घेतले तर संपूर्ण समाज नावे ठेवायला तयार असतोच. “लोक काय म्हणतील’ ह्या एका वाक्यामुळे अनेकांची स्वप्ने पूर्ण होत नाहीत. त्यामुळे वेगळे करणाऱ्याला समाजाकडून प्रोत्साहन, लागेल ती मदत मिळणे फारच दुरापास्त गोष्ट आहे.
राजकीय व्यवस्था- कोलंबसला तिथल्या राजकीय व्यवस्थेने आर्थिक सहकार्य आणि प्रोत्साहित केले नसते तर अमेरिकेचा शोध कसा लागला असता. तिथली राजकीय व्यवस्था आजही संशोधक, कलाकारांना उच्च दर्जाचे मानतात आणि त्यांना हवे ते राजकीय पाठबळ पुरवतात. त्यामुळे तिथले लोक एखाद्या ध्येयासाठी आयुष्य वेचतात. तिथल्या संशोधकांना समाजात मानसन्मान आणि आर्थिक साहाय्य असते. अनेक कारणांमुळे आपल्या देशातील हुशार, संशोधक वृत्तीचे लोक परदेशात संशोधनासाठी जातात.
पाश्चिमात्य देशांमध्ये समुद्रातून प्रवास ही जेव्हा संधी होती, तेव्हा आपल्याकडे तेच धार्मिक उल्लंघन होते. त्यानंतरही भारताने संशोधनामध्ये जी प्रगती केली आहे ती गौरवशाली आहेच, पण त्यात अधिक प्रगती होणे गरजेचे आहे. पाश्चिमात्य देशांमध्ये राज्यव्यवस्था, धर्मव्यवस्था आणि समाजव्यवस्था ह्या वेगवेगळ्या संस्था म्हणून वेगवेगळ्या स्तरावर काम करत असतात. आपल्या देशात सगळीच सरमिसळ आहे. बऱ्याचवेळा राजकीय व्यवस्था आपल्या सोयीने सामाजिक आणि धार्मिक व्यवस्थेचा वापर करत असते. हे जग म्हणजे आपले कुटुंब आहे. आणि या कुटुंबाचा उत्तरोत्तर अधिक विकास करणे ही आपली जबाबदारी आहे. आपल्या देशातही संशोधनासाठी सामाजिक, धार्मिक, राजकीय पोषक वातावरण तयार होईल तेव्हा आपला देशही पूर्वीसारखा जगाला उपयुक्त असे शोध लावून देईन. या पृथ्वी ग्रहाचा सर्वांगीण विकास करण्यात भारतीय मागे राहणार नाहीत. हे नक्की.