हवामान खात्याने पावसाचा इशारा दिला आहे, जिल्हा प्रशासनाने यापूर्वीच खबरदारी घेतली असून सर्व मतदान यंत्रे पावसाच्या पाण्यापासून सुरक्षित आहेत. कोणत्याही मतदान केंद्रात पाण्याची गळती नसल्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यातील मतदार सुजाण असून ते हवामानाची चिंता न करता आपला मतदानाचा हक्क बजावतील, असा विश्वास जिल्हाधिकारी राम यांनी व्यक्त केला. जी मतदान केंद्र पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर होती, ती तळमजल्यावर आणण्यात आली असून त्याबाबतची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. जी मतदान केंद्रे पहिल्या अथवा दुसऱ्या मजल्यावर आहेत, तिथे लिफ्टची सोय उपलब्ध आहे. दिव्यांग मतदार, वयोवृद्ध मतदार यांच्याबाबत किमान आवश्यक सुविधा उपलब्ध असल्याचेही राम यांनी सांगितले.
काही मतदान केंद्राच्या परिसरात पावसामुळे थोडा चिखल झाला आहे, तिथे बारीक मुरुम टाकून तो परिसर चिखलमुक्त करण्याची योग्य ती खबरदारी घेण्यात आली असून मतदारांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याची ग्वाही जिल्हाधिकारी राम यांनी दिली.
594 केंद्रांवर प्रथमोपचार पेटी
आरोग्य विभागाकडून शहरातील सुमारे 594 मतदान केंद्रावर प्रथमोपचार पेटी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या पेटीतील औषधे तसेच त्यांची माहिती मतदान केंद्रावर देण्यात आलेल्या आरोग्य विभागाच्या पुस्तीकेत देण्यात आलेली आहे. याशिवाय महापालिकेच्या 15, तसेच राज्यशासनाच्या 40 रुग्णवाहिका आठही मतदारसंघात उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.
2,781 मतदान केंद्रांवर दिव्यांगांसाठी मदतनीस
दरम्यान, शहरातील दिव्यांग मतदारांची माहिती एकत्र करून त्यांचे मतदान असलेल्या सुमारे 2,781 केंद्रावर व्हीलचेअर तसेच मदनिसांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, यंदा सुमारे 28 हजार 908 दिव्यांग मतदार असून त्यांची प्रत्येक विधानसभानिहाय माहितीच्या आधारे त्यांचे मतदान असलेल्या केंद्रांची यादी तयार करून तेथे रॅम्पसह, त्यांना आवश्यक असलेल्या इतर सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.