टोरांटो :- भारतात खलिस्तानवादी कारवाया करणारा हरदीपसिंग निज्जर आणि त्याच्यासारख्या अनेक दहशतवाद्यांना कॅनडामध्ये आश्रय दिला गेल्याच्या मुद्द्यावरून भारत आणि कॅनडा या दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. एवढेच नव्हे तर बांगलादेशचे संस्थापक शेख मुजीबूर रेहमान यांच्या मारेकऱ्यालाही कॅनडाने आश्रय दिला आहे.
शेख मुजीबूर रेहमान यांच्या हत्येची कबुली देणाऱ्या नूर चौधरी याला बांगलादेशच्या स्वाधीन करण्याची बांगलादेशची विनंती कॅनडाने अमान्य केली आहे. त्यामुळे कॅनडामध्ये विभाजनवाद्यांबरोबर दहशतवाद्यांना सुरश्रित आश्रय दिला जात असल्याच्या भारताच्या दाव्याला पुष्टीच मिळते आहे.
नूर चौधरीच्या प्रत्यार्पणाला कॅनडाने नकार दिल्याची माहिती बांगलादेशचे परराष्ट्रमंत्री ए. के. अब्दुल मोमेन यांनी दिली आहे. “मारेकऱ्यांसाठी कॅनडा एक सुरक्षित आश्रयस्थान बनता कामा नये. हे मारेकरी कॅनडामध्ये सुरक्षित आणि आरामदायक जीवन जगत असतात आणि त्यांनी ज्यांची हत्या केली त्यांच्या कुटुंबीयांना मात्र आपल्या निकटवर्तीयांना गमावल्याचे दुःख करत मायदेशातच राहावे लागते आहे,’ असे मोमेन म्हणाले.
मारेकऱ्याला फाशीची शिक्षा देण्याला कॅनडाकडून विरोध होतो आहे. कॅनडाची ही भूमिका म्हणजे मारेकऱ्यांना, दहशतवाद्यांना आणि विभाजनवाद्यांना वाचवण्याचे प्रयत्न मानले जात आहेत. मात्र शेख मुजीबूर रेहमान यांच्या मारेकऱ्याला फाशी द्यायची की नाही, याचा निर्णय बांगलादेशच्या कायद्यानुसार होईल. त्या विषयामध्ये सरकार कोणताही हस्तक्षेप करणार नाही. तशी कोणतीही हमी कॅनडाला दिली जाऊ शकणार नाही, असे मोमेन यांनी ठामपणे सांगितले आहे.
बांगलादेशचे संस्थापक शेख मुजीबूर रेहमान यांच्या हत्येची कबुली नूर चौधरी आणि रशिद चौधरी यांनी दिली आहे. त्यांनी दयेचा अर्ज केल्यास त्यांच्या फाशीच्या शिक्षेचे रुपांतर आजन्म कारावासाच्या शिक्षेमध्ये केले जाऊ शकते. मात्र त्याबाबतचा निर्णय कायद्यानुसार घेतला जाईल, असेही मोमेन यांनी म्हटले आहे.