मुंबई – यंदाचा ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार’ ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी प्रदान करण्यात आला. हा सोहळा पाहण्यासाठी अनेक अनुयायी नवी मुंबईतील खारघरमध्ये आले होते. मात्र हा सोहळा रणरणत्या उन्हात घेण्यात आला होता. यामुळे उष्माघाताने तब्बल 14 जणांचा मृत्यू झाला असल्याचे समोर आले आहे. या घटनेचे तीव्र पडसाद राज्याच्या राजकीय वर्तुळातही उमटताना दिसत आहेत.
दरम्यान, या दुर्दैवी घटनेत मृत पावलेल्या अनुयायांच्या कुटुंबियांना राज्य सरकारने प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर केली आहे. मात्र, आता या घटनेनंतर काँग्रेस प्रदेशाध्य नाना पटोले यांनी राज्यपाल रमेश बैस यांना पत्र लिहून एक मागणी केली आहे. या घटनेवर चर्चा करण्यासाठी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. या संदर्भातील एक ट्विट देखील त्यांनी आपल्या अधिकृत आकाउंटवरून केलं आहे.
खारघर येथे पार पडलेल्या महाराष्ट्र भूषण सोहळ्यात १४ श्री सदस्यांचा मृत्यू झाला आहे. सदोष मनुष्यवधाच्या या घटनेवर चर्चा करण्यासाठी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणी राज्यपाल रमेश बैस यांना पत्र लिहून केली आहे. pic.twitter.com/MQXjE2TuHl
— Nana Patole (@NANA_PATOLE) April 19, 2023
काय आहे पत्र, वाचा…
श्री. रमेश बैस, महोदय,
विषय- खारघर येथील सदोष मनुष्यवध प्रकरणी
विधीमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावणेबाबत…. खारघर येथे दिनांक 16 एप्रिल 2023 रोजी महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहळ्यात 14 श्रीसदस्यांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत गंभीर व मनाला वेदना देणारी आहे. ज्येष्ठ निरुपणकार श्री. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्यावर प्रेम करणारे जवळपास 20 लाख श्रीसदस्य राज्यभरातून या कार्यक्रमासाठी आले होते. हा सोहळा राज्य सरकारने आयोजित केला होता तसेच यासाठी तब्बल 13 कोटी रुपये सरकारी तिजोरीतून खर्च केले गेले.
एवढा मोठा खर्च करुनही लाखो श्रीसदस्यांना मात्र कडक उन्हात तासन तास बसावे लागले, त्यांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून साधे छत लावण्याची तसदी सरकारने घेतली नाही. त्यांना पिण्याचे पाणीही मिळू शकले नाही आणि उष्माघाताने अनेक श्रीसदस्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. यातील आणखी धक्कादायक बाब म्हणजे उष्माघाताबरोबर चेंगराचेंगरी झाल्याच्या बातम्याही विविध प्रसार माध्यमातून येत आहेत, हा प्रकार अत्यंत गंभीर आहे. सरकारला या कार्यक्रमाचे योग्य नियोजन करता आले नाही. ढिसाळ नियोजनामुळे 14 श्रीसदस्यांचे मृत्यू झाले आहेत व 500 पेक्षा जास्त श्रीसदस्य उपचार घेत आहेत. हा आकडा यापेक्षा जास्त असण्याची शक्यता नाकारता येत नाही, सरकार मात्र सत्य परिस्थिती लपवत आहे.
खारघरची घटना महाराष्ट्राला शरमेने मान खाली घालावयास लावणारी आहे. या घटनेतील मृत्यू हे सरकारच्या बेजबाबदार व नियोजनशून्य कारभाराचे उदाहरण आहे. एवढी मोठी घटना झाल्यावर राज्य सरकार मात्र महाराष्ट्र भूषण श्री. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्यावरच जबाबदारी ढकलत आहे. या घटनेकडे राज्य सरकार गांभीर्याने पहात नसल्याचे दिसत आहे. मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची आर्थिक मदत देऊन सरकार यातून आपली सुटका करुन घेऊ पहात आहे. जेव्हा की, हा सदोष मनुष्य वधाचा गुन्हा आहे.
महोदय, खारघर घटनेप्रकरणी अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. सरकार सत्य परिस्थिती दडवत आहे. ही घटना महाराष्ट्राची प्रतिमा मलिन करणारी आहे. सरकारच्या नाकर्तेपणामुळे ही घटना झाली आहे असे आमचे स्पष्ट मत आहे. या घटनेची सत्य परिस्थिती जनतेसमोर यावी व भविष्यात असा प्रकार घडू नये म्हणून सर्व मुद्द्यांवर सविस्तर चर्चा होणे गरजेचे आहे. त्यासाठी विधीमंडळाचे दोन दिवशीय विशेष अधिवेशन बोलावण्याचे आदेश राज्य सरकारला आपण द्यावेत, अशी आमची विनंती आहे. धन्यवाद..!!