कामशेत, – मावळ तालुक्याच्या पाले गावातील दोन शेळ्या बिबट्याने केलेल्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडल्या. त्यानंतर भयभीत झालेल्या नागरिकांनी बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरे लावण्याची मागणी केली. मात्र ही मागणी वन विभागाने धुडकावून लावली आहे. पाळीव प्राणी हे देखील बिबट्याचे खाद्य आहे. जोपर्यंत बिबट्या माणसावर हल्ला करीत नाही, तोपर्यंत त्यास पकडता येणार नाही, असा खुलासा वनविभागाने केला आहे.
आंदर मावळ, पवन मावळ आणि नाणे मावळ परिसरात बिबट्याचा वावर वाढला आहे. बिबट्याच्या मुक्त संचारामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. मोठ्या प्रमाणात जंगलतोड झाल्याने बिबट्या लपण्यासाठी ऊसाच्या शेतीचा वापर करीत आहे. त्यामुळे थ्री-फेज लाइट आल्यावर रात्रीच्यावेळी ऊसाला पाणी देण्यासाठी जाण्यास शेतकरी घाबरत आहेत. तसेच कान्हे परिसरातील महिंद्रा कंपनीच्या आवारात बिबट्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आढळून आल्याने एमआयडीतील कामगारांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्याला पकडण्याऐवजी वनविभाग जनजागृती करीत आहे. गावागावांत जाऊन ग्रामस्थांच्या बैठका घेत असून बिबट्याबाबतची माहिती पत्रके ग्रामस्थांना देत आहे.
जंगल परिसरात माणसांची वर्दळ वाढली आहे. त्यामुळे बिबट्या आणखी जवळ येऊ लागला असल्याचे वनविभागाचे म्हणणे आहे. ऊसशेतीच्या क्षेत्रात बिबट्याला सुयोग्य वातावरण व पाळीव प्राण्यांचे खाद्य मिळते. वन्य प्राण्यांच्या शिकारीला आळा घालण्यास वन विभागाला यशस्वी झाला आहे. बिबट्याचे आयुष्यमान वाढले आहे. त्यामुळे बिबट्यांची संख्या वेगाने वाढत आहे.
गाय, बैल, शेळ्या, मेंढ्या, मांजर, कुत्री हे पाळीव प्राणी बिबट्याचे अन्न आहे. त्यांची शिकार केली म्हणून बिबट्याला पकडण्यासाठी सापळे लावता येणार नाहीत. जर बिबट्याने मनुष्यावर हल्ला केला तर त्यास पकडण्यासाठी सापळे लावले जातील.
– सुशील मंतावर, वनपरिक्षेत्र अधिकारी
असा आहे बिबट्याचा जीवनकाळ
बिबट्याच्या मादीचा गर्भधारणेचा काळ 90 ते 105 दिवस असून ती एका वेळेला 1 ते 4 पिलांना जन्म देते. बिबट्याचा बछडा तीन महिन्यांतच बाहेरचे अन्न (मांस) खातो. बछडे मोठे होऊन स्वावलंबी झाल्यानंतर आईपासून होतात वेगळे. साधारणपणे बिबट्याचा जीवनकाल पंधरा ते सतरा वर्षांचा असतो.