महाराष्ट्र आणि देशातील जनतेने कोरोनाच्या विषाणूवर विजय मिळवून आयुष्याच्या नवीन वाटचालीचा श्रीगणेशा सुरू केला हे खरे असले तरी महागाईच्या सरकारनिर्मित विषाणूला तोंड कसे द्यायचे, याचे मात्र कुठलेही उत्तर जनतेला सापडताना दिसत नाही. निवडणुकीपुरती स्वस्ताईची गुढी उभारून निवडणुका संपल्यावर महागाईची काठी उगारणाऱ्या केंद्रीय सरकारशी नवीन वर्षात जनतेला दोन हात करावे लागतील असे दिसते. कोरोनाचा राक्षस गाडून जनतेने एक युद्ध जिंकले आहे. आता जनतेला नवनिर्मितीबरोबरच महागाईला गाडण्यासाठी संघर्षाचीही गुढी उभारावीच लागेल.
लागोपाठ दोन वर्षे गुढीपाडव्याचा सण कोरोनाच्या सावटाखाली गेल्यानंतर यंदाच्या हिंदू व मराठी नववर्षाची सुरुवात उत्तम झाली आहे. गुढीपाडव्यापासून राज्यातील कोरोनाचे सर्व निर्बंध मागे घेण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी केली. कोरोनाचे संक्रमण आणि या प्राणघातक विषाणूची दहशत कमी झाल्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकारने कोरोनाचे सर्व निर्बंध दूर केल्यामुळे महाराष्ट्राने व तमाम मराठी जनतेने तब्बल दोन वर्षांनंतर सुटकेचा मोकळा श्वास घेतला आहे. गुढीपाडवा हे विजयाचे आणि नवनिर्मितीचे प्रतीक मानले जाते. जगभरात हाहाकार उडविणाऱ्या कोरोनासारख्या महामारीचा महाराष्ट्रातील जनतेने समर्थपणे मुकाबला केला आणि या भयंकर आपत्तीवर विजय मिळवला म्हणून यंदाच्या गुढीपाडव्याला नक्कीच विशेष महत्त्व आहे. भूतकाळात जे झालं, ते घडून गेलं. कोरोनासारख्या संकटाने दोन वर्षांत सगळ्या जगाची घडी विस्कटून टाकली. अनेकांनी आपले आप्तस्वकीय गमावले. असंख्य कुटुंबांतील कर्तेधर्ते कोरोनाने हिरावून नेले. प्रचंड मनुष्यहानी झाली आणि आर्थिक नुकसानीची तर मोजदादच नाही. मात्र, अखेर मनुष्य जिंकला आणि कोरोना पराभूत झाला. कोरोनाचे अरिष्ट हे मानवनिर्मित होते की नैसर्गिक याचा छडा लागायचा तेव्हा लागेल, पण तूर्तास मानवजातीने या’
संकटावर मात
केली हे तर वास्तव आहे. त्यामुळे यंदाचा गुढीपाडवा जल्लोषात साजरा होईल. निर्बंध हटल्यामुळे नवीन वर्षाचे स्वागत करणाऱ्या मिरवणुकाही दणक्यात निघतील. झालं गेलं विसरून मराठी माणूस ढोलताशांच्या गजरात, पारंपरिक वेशभूषेत या मिरवणुकांत सहभागी होईल. घरोघरी आनंदाने गुढय़ा उभारल्या जातील. अनेक शुभारंभांबरोबरच नवीन खरेदीमुळे शहरापासून गावखेडय़ांपर्यंत सर्वत्र आज आनंदी आनंदच दिसेल. रावणाचा विनाश करून प्रभू रामचंद्रांनी अयोध्येत पाऊल ठेवले, तो हा दिवस. चौदा वर्षांचा वनवास पूर्ण करून, रावणावर विजय मिळवून परतलेल्या आपल्या लाडक्या राजाचे अयोध्यावासीयांनी घराघरांवर गुढय़ा आणि तोरणे उभारून स्वागत केले होते. ती विजयपताका म्हणजेच हा गुढीपाडव्याचा सण. आज महाराष्ट्रातील आणि देशातील जनताही कोरोनाचा विनाश करून भयमुक्त आणि संकटमुक्त झाली आहे. त्यात आपत्ती व्यवस्थापन आणि साथ प्रतिबंधक कायद्याने कोरोना काळात जे निर्बंध लावण्यात आले होते, ते उठवून राज्यातील आघाडी सरकारने महाराष्ट्रातील जनतेला ‘पाडवा भेट’च दिली. जुने विसरून नवीन कार्याचा प्रारंभ करणारा दिवस म्हणून आपण गुढीपाडव्याकडे पाहतो. या दिवसापासूनच वसंत ऋतूचे आगमन होते. निसर्गचक्रानुसार शिशिरातील पानगळ संपून वृक्षवल्लींना नवी पालवी फुटू लागते. जीवसृष्टीत होणारा हा महत्त्वाचा बदल गुढीपाडव्याचे महत्त्व
अधोरेखित करण्यास पुरेसा
आहे. एका अर्थाने गुढीपाडवा म्हणजे सृष्टीचा वाढदिवसच. कारण सृष्टीची निर्मिती करण्यासाठी ब्रह्मदेवाने जो दिवस निवडला होता, तो चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवाच. हिंदू धर्मात कोणतेही मंगलकार्य सुरू करण्यासाठी जे साडेतीन मुहूर्त सांगितले आहेत, त्यातील पहिला दिवस म्हणजे गुढीपाडवा. त्यानंतर विजयादशमी, अक्षय्यतृतीया आणि बलिप्रतिपदा हे मुहूर्त येतात. गुढीपाडवा म्हणजे विजयाचा आणि नवे संकल्प व नवनिर्मितीचा दिवस. त्यामुळेच तर नवीन उद्योग, व्यापार, प्रकल्प उभारणी, इतकेच काय, घर खरेदी, वाहन व छोटय़ा-मोठय़ा वस्तूंच्या खरेदीसाठीही बहुतांश लोक वाट पाहतात ती गुढीपाडव्याचीच. त्यामुळे बाजारपेठांत आज खरेदीची आणि घरोघरी नवआगमनाची लगबग दिसेल. महाराष्ट्र आणि देशातील जनतेने कोरोनाच्या विषाणूवर विजय मिळवून आयुष्याच्या नवीन वाटचालीचा श्रीगणेशा सुरू केला हे खरे असले तरी महागाईच्या सरकारनिर्मित विषाणूला तोंड कसे द्यायचे याचे मात्र कुठलेही उत्तर जनतेला सापडताना दिसत नाही. निवडणुकीपुरती स्वस्ताईची गुढी उभारून निवडणुका संपल्यावर महागाईची काठी उगारणाऱ्या केंद्रीय सरकारशी नवीन वर्षात जनतेला दोन हात करावे लागतील असे दिसते. कोरोनाचा राक्षस गाडून जनतेने एक युद्ध जिंकले आहे. आता जनतेला नवनिर्मितीबरोबरच महागाईला गाडण्यासाठी संघर्षाचीही गुढी उभारावीच लागेल.